Twisha Sharma Death Case | मॉडेल ट्विशा शर्मा (Twisha Sharma) मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देशभरात एकच खळबळ उ़डाली आहे. 12 मे रोजी ट्विशा शर्मा ही भोपाळमधील (Bhopal) तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. संशयास्पद स्थितीमध्ये तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. त्यामुळे ट्विशाच्या मृत्यू प्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशातच आता ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्यांवर संशय घेत भोपाळ न्यायालयात दुसऱ्या शवविच्छेदनासाठी याचिका दाखल केली आहे, ज्यावर आज (20 मे) सुनावणी होणार आहे.
हेही वाचा – “…तर आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू”, 10 दिवसांतच विजय सरकार संकटात? सीपीआयएमने दिला थेट इशारा
ट्विशाच्या कुटुंबियांनी नेमकी काय केली मागणी?
ट्विशाच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे की, तिचे शवविच्छेदन दिल्लीतील एम्स (AIIMS) रूग्णालयात पुन्हा करण्यात यावे. ट्विशाच्या कुटुंबीयांनी भोपाळ एम्सचा शवविच्छेदन अहवाल फेटाळला असून त्यांनी पुन्हा एकदा तिच्या शवविच्छेदनाची मागणी केली आहे.
ट्विशाचे कुटुंब शवविच्छेदन अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, ट्विशाच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या. ते पोलिसांवर पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा थेट आरोप करत आहेत. ट्विशाच्या पालकांचे म्हणणे आहे की, ट्विशाच्या गळ्याभोवती सापडलेल्या पट्ट्याची तपासणी न करताच शवविच्छेदन करण्यात आले आहे, असा आरोप ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे.
दुसरीकडे ट्विशाच्या सासू, निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह आणि तिचा पती समर्थ सिंह यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. तर ट्विशाचा पती समर्थ सिंह याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. सध्या समर्थ सिंह हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी समर्थ सिंहबद्दल माहिती देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सासू गिरीबाला सिंग यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला असून या अर्जात त्यांनी धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी जामीन अर्जात ट्विशाला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचं म्हटलं आहे. तसेच जर ट्विशाला अमली पदार्थ मिळाले नाहीत, तर तिचे हात थरथरत असायचे. तसेच ट्विशा प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या वागण्यात बदल झाला होता. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे ट्विशाने गर्भपातही केला होता. ट्विशाची मानसिक स्थिती चांगली नव्हती, तिच्यावर मानसशास्त्रज्ञाकडून उपचार सुरू होते, असा दावा ट्विशाच्या सासूने केला आहे.
ट्विशाच्या सासूने केलेले हे सर्व दावे तिच्या कुटुंबीय खोटे असल्याचं म्हटलं आहे. तसंच लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या ट्विशाच्या मृत्यूने संपूर्ण प्रकरण गूढ आणि वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिची सासू आणि पती यांच्यावर हुंडा, छळ आणि हत्येचा आरोप केला आहे.












