Tamilnadu Politics | तामिळनाडूच्या (Tamilnadu) राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री विजय यांचे सरकार स्थापन होऊन दहा दिवसही उलटले नाहीत तोवर त्यांचे पद धोक्यात आले आहे. सीपीआयएमने विजय सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, जर विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने एआयएडीएमकेच्या कोणत्याही गटासोबत किंवा एआयएडीएमकेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर ते आपल्या निर्णयावर पुनर्विचार करतील.
हेही वाचा – वाल्मिक कराडला तुरूंगातच झाला मोठा संसर्ग; अचानक बिघडली प्रकृती, नेमकं झालं तरी काय?
सीपीआयएमने विजय सरकारला नेमका काय दिला इशारा?
सीपीआयएमचे राज्य सचिव पी. षण्मुगम म्हणाले की, टीव्हीकेला आम्ही पाठिंबा दिला कारण तामिळनाडू आणखी एका निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार नव्हते. तसेच राष्ट्रपती राजवट लादून मागच्या दाराने तामिळनाडूवर राज्य करण्याचा भाजपचा हेतू पूर्ण होऊ न देणे हे आमचे उद्दिष्ट होते. तर जनादेश डीएमके आणि एआयएडीएमकेच्या विरोधात होता त्यामुळे टीव्हीके 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला, पण त्यालाही बहुमत मिळू शकले नाही.
टीव्हीके पक्षालाच सरकार स्थापन करण्याची संधी होती, त्याच आधारावर तामिळनाडूमध्ये जनतेच्या पसंतीचे सरकार स्थापन झाले पाहिजे. याच उद्देशाने डाव्या पक्षांनी आणि व्हीसीकेने टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. जर त्यांनी एआयएडीएमकेकडून पाठिंबा घेतला किंवा त्यांच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले, तर ते जनादेशाच्या विरोधात असेल. हे विजय यांच्या स्वच्छ आणि चांगले सरकार चालवण्याच्या निवडणूक आश्वासनाच्या विरोधात असेल. जनादेश एआयएडीएमके आणि डीएमकेच्या विरोधात असल्याने, त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा कोणताही प्रयत्न जनतेच्या निर्णयाच्या विरोधात असेल. आम्हाला आशा आहे की ते असा निर्णय घेणार नाहीत, परंतु जर त्यांनी एआयएडीएमकेच्या कोणत्याही गटासोबत सरकार चालवण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही आमच्या निर्णयावर निश्चितपणे पुनर्विचार करू, अशा थेट इशारा पी. षण्मुगम यांनी दिला आहे.
दरम्यान, टीव्हीकेला काँग्रेस, डावे पक्ष, व्हीसीके आणि आययूएमएल यांचा पाठिंबा मिळाला आहे, ज्याच्या आधारावर टीव्हीकेचे सरकार स्थापन झाले आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार, आपले सरकार स्थिर आणि मजबूत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जोसेफ विजय हे एआयएडीएमकेच्या 25 बंडखोर आमदारांना सरकारमध्ये सामील करून घेण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहेत. या चर्चेदरम्यान सीपीआयएमकडून पाठिंबा काढून घेण्याच्या धोक्यामुळे मुख्यमंत्री विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत.












