• Home
  • देश
  • इराण–अमेरिकेतील चर्चा अयशस्वी; तणाव पुन्हा टोकाला, युद्ध पेटणार?
Top News

इराण–अमेरिकेतील चर्चा अयशस्वी; तणाव पुन्हा टोकाला, युद्ध पेटणार?

jd vance

US-Iran War | नुकतीच अमेरिका (US) आणि इराणमध्ये (Iran) युद्ध (War) संपवण्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. मध्यपूर्वेतील हा संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात बैठक झाली. मात्र, या बैठकीतील महत्त्वपूर्ण चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपली. त्यामुळे इराण आणि अमेरिकेतली चर्चा अयशस्वी ठरली आहे. याबाबतची माहिती अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी दिली आहे.

हेही वाचा –  “भाजपकडून मित्रपक्षांची शिकार होणार…”, रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, काम कमी कुरापती जास्त…

नेमकी काय चर्चा झाली अमेरिका आणि इराणमध्ये?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, 21 तास चाललेल्या चर्चेनंतरही दोन्ही देशांमध्ये एकमत होऊ शकले नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या मात्र, कोणताही निष्कर्ष या चर्चेतून निघाला नाही. अमेरिकेची मुख्य मागणी ही होती की इराणने कोणताही अणुशस्त्र कार्यक्रम किंवा संबंधित कार्यक्रम पूर्णपणे सोडून देण्याची स्पष्ट आणि ठोस वचनबद्धता द्यावी. परंतु इराणने याचे पालन करण्यास नकार दिला.

चर्चा का ठरली अपयशी?

आम्हाला इराणकडून ठोस हमी हवी आहे की इराण अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा तसे करण्याची साधने वेगाने मिळवणार नाही. तसेच सध्या आम्ही कोणताही करार न करता अमेरिकेकडे परत जात आहोत, अशी माहिती जेडी व्हान्स यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, वाईट बातमी ही आहे की आम्ही करारावर पोहोचलेलो नाही. मला असं वाटतं की ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी अधिक वाईट बातमी आहे. त्यामुळे, आम्ही कोणताही करार न करता अमेरिकेकडे परत जात आहोत. इराणने आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. आम्ही गेल्या 21 तासांपासून इराणी लोकांशी चर्चा करत आहोत. त्यामुळे वाईट बातमी ही आहे की आम्ही करारावर पोहोचलेलो नाही”, असंही जेडी व्हान्स यांनी सांगितलं.

दुसरीकडे या चर्चेबाबत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई म्हणाले की, या चर्चेचे यश हे समोरची बाजू किती प्रामाणिकपणा आणि समतोलपणा दाखवते यावर अवलंबून आहे. गेल्या 24 तासांत होर्मुझची सामुद्रधुनी, अणुकार्यक्रम, निर्बंध हटवणे, युद्ध नुकसान भरपाई आणि संपूर्ण प्रदेशातील शत्रुत्व संपवणे यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच त्यांनी अमेरिकेवर अवाजवी आणि बेकायदेशीर मागण्या केल्याचा आरोप केला.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यामुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कारण मध्य-पूर्वेतील हे युद्ध पुन्हा पेटणार का? अशी भीती सध्या व्यक्ती केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts