Jarange Defender ; महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चांगलाच पेटलाय, मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या विविध भागांत दौरे करून मराठा समाजाला संघटित करत आहेत. त्यांचा हा शांतता संवाद दौरा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू असून सांगलीत आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील एका आलिशान वाहनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जरांगे पाटील हे ज्या गाडीतून प्रवास करत होते, ती लँड रोव्हर कंपनीची ‘डिफेंडर’ ही अत्यंत महागडी लक्झरी कार आहे. बाजारात या गाडीची किंमत सुमारे दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका बाजूला मराठा समाजातील गरिबी आणि आरक्षणाची गरज सांगतात आणि दुसरीकडे आंदोलनाचं मुख्य नेतृत्वच एवढ्या महागड्या गाडीतून फिरत असल्याचा मुद्दा विरोधकांनी तात्काळ उचलून धरला. त्यामुळे जरांगेंच्या दाडी कोटींच्या गाडीवरून कसा वाद पेटलाय?
जरांगे पाटलांची दीड कोटींची Defender गाडी; मराठा आरक्षणावरून नवा वाद ( Jarange Defender )
हा मुद्दा समोर येताच ओबीसी नेते आणि विरोधी पक्षांतील काही प्रमुख नेत्यांनी जरांगे पाटलांना घेरण्यास सुरुवात केली. सोशल मीडियापासून ते थेट राजकीय सभांपर्यंत जरांगे यांच्या गाडीची आणि त्यांच्या कथित श्रीमंतीची चर्चा रंगू लागली. विरोधकांनी अत्यंत आक्रमकपणे विचारले की, स्वतःला सामान्य शेतकरी आणि गरीब कुटुंबातील म्हणवणारे मनोज जरांगे पाटील एकाएकी दीड कोटीच्या गाडीत कसे काय बसू शकतात? आंदोलनासाठी आणि या दौऱ्यांसाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठून येतो? यामागे कोणत्या बड्या राजकीय नेत्याचा किंवा शक्तीचा हात आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांच्या हेतूवर आणि त्यांच्या आंदोलनाच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला. दीड कोट्याच्या गाडीतून फिरणारे जरांगे, त्यामुळे मराठा समाज किती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, हे दिसून येतं, त्यामुळे खरंच त्यांना आरक्षणाची गरज आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
या गंभीर आणि थेट आरोपांनंतर मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) गप्प बसणारे नव्हते. सांगलीतील प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अत्यंत संतप्त आणि तितक्याच उपरोधिक भाषेत विरोधकांना सुनावले. जरांगे पाटील म्हणाले की, विरोधक सध्या माझं खूप उकरू लागले आहेत आणि माझ्यावर या लोकांचं खूप बारीक लक्ष आहे. पण मला त्याची अजिबात पर्वा नाही. माझ्याकडे स्वतःची अशी कोणतीही महागडी गाडी नाही आणि माझ्या खात्यात एक रुपयाही नाही. ही गाडी माझी नसून मराठा समाजातील एका अत्यंत प्रेमळ कार्यकर्त्याची आहे. प्रत्येक जातीमध्ये जसा श्रीमंत आणि गरीब वर्ग असतो, तसाच तो मराठा समाजातही आहे. माझ्या समाजातील एखाद्या सुदैवी तरुणाने किंवा कार्यकर्त्याने स्वकष्टाने नवीन गाडी घेतली, तर त्याला असं वाटतं की आपल्या नेत्याने पहिल्यांदा त्या गाडीत बसावं. तो अत्यंत अभिमानाने आणि हक्काने मला सांगतो की, ‘पाटील, ही नवीन गाडी घेतली आहे, आता तुम्ही माझ्या या गाडीत बसा आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरा.’ यात चुकीचं काय आहे, असा उलटसवाल त्यांनी केला.
हेही वाचा : बिअरच्या बाटल्या हातात अन् भरधाव कारमधून स्टंट; पुण्यातील VIDEO पाहून पोलिसांची धावपळ
जरांगे पाटलांनी विरोधकांना काय उत्तर दिलं? ( Jarange Defender )
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी विरोधकांचा समाचार घेताना अत्यंत तीव्र शब्दांचा वापर केला. ते म्हणाले की, माझ्यावर जळणाऱ्यांची संख्या सध्या राज्यामध्ये खूप वाढली आहे. मी डिफेंडर गाडीमध्ये फिरतोय तर यांच्या पोटात का दुखतंय? मला माझ्या समाजाने खूप मोठे केले आहे आणि मी केवळ माझ्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी, समाजातील तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. माझी जात माझ्यावर मनापासून प्रेम करते आणि म्हणूनच ते मला त्यांच्या गाड्या अभिमानाने वापरायला देतात. ‘तुम्हाला कोणी अशी गाडी देतं का?’ असा थेट सवाल त्यांनी केलाय. तसेच, आपण कोणत्याही गाडीत बसू, तो आपला आणि आपल्या समाजाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही, असेही त्यांनी खडसावले.
हा वाद केवळ गाडीच्या किमतीपुरता मर्यादित नसून यामागे महाराष्ट्रातील आगामी निवडणुका आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा रंगत चाललेला राजकीय संघर्ष कारणीभूत असल्याचे दिसते. जरांगे यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर अगदी खालच्या पातळीवर टीका केली जात आहे, तर महायुतीचं मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय गणित बिघडले आहे. जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात घेतलेल्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडूनही अर्थात त्यांना प्रत्युत्तर म्हणून वैयक्तिक पातळीवर लक्ष्य केले जात आहे. कार्यकर्त्यांच्या मते, जरांगे पाटलांची प्रतिमा एक साधे आणि प्रामाणिक नेतृत्व अशी आहे. हीच प्रतिमा डागाळण्यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अशा लक्झरी गाडीचा मुद्दा उपस्थित करून समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर गाडीच्या मुद्द्याचा परिणाम ( Manoj Jarange Patil )
दुसरीकडे जरांगे पाटील यांनी आपण या राजकीय चिखलफेकीला घाबरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे की, तुम्ही माझ्यावर कितीही पाळत ठेवली किंवा माझे कितीही उकरून काढण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला माझ्याविरोधात काहीही सापडणार नाही. कारण माझे आयुष्य आणि माझे आंदोलन अत्यंत पारदर्शक आहे. मी माझ्या समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही आणि सरकार किंवा विरोधक कितीही शक्तिशाली असले तरी त्यांच्या दबावाला बळी न पडता मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझ्या समाजातील मुलांना भविष्यात लाल दिव्याच्या गाडीत बसलेले पाहणे हे माझे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी अशा फालतू आरोपांकडे दुर्लक्ष करून माझा लढा सुरूच ठेवणार आहे. सांगलीतील या डिफेंडर गाडीच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. हा वाद येत्या काळात शांत होतो की यावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.









