Suvendu Adhikari PA Murder Case | पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (CM Suvendu Adhikari) यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांच्या खून प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात बंगाल पोलिसांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. कारण पोलिसांनी या प्रकरणी चुकीच्या व्यक्तीला अटक केली होती. तर आता सीबीआयने या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा – शरद पवार गटाच्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?
बंगाल पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला केलेली अटक, सीबीआयला सापडला खरा आरोपी
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या स्थानिक पोलिसांनी या खून प्रकरणात चुकीच्या व्यक्तीला अटक केली होती. तर आता चुकीच्या अटक करण्यात आलेल्या राज सिंग यांची न्यायालयाने सुटका केली आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या या चुकीमुळे त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला तीन जणांना अटक केली होती. यामध्ये मयंक मिश्रा आणि विकी मौर्य यांना बिहारमधील बक्सर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंगाल पोलिसांच्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी बलिया येथे राज सिंग नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक करून 13 दिवस तुरूंगात ठेवले होते. मात्र, आता जेव्हा सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्थानिक पोलिसांनी अटक केलेला राज सिंग हा चुकीचा व्यक्ती होता.
सीबीआयने नुकतंच मुझफ्फरनगरमधून अस्ली राजकुमार उर्फ राज सिंग नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे आणि हा या हत्येचा खरा सूत्रधार आणि मुख्य आरोपी आहे. तसेच याबाबतची माहिती सीबीआयने न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे आता न्यायालयाने पोलिसांनी पकडलेल्या राज सिंगला सोडून दिले आहे.
दरम्यान, सीबीआयने अलीकडेच वाराणसीमधून विनय राय नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या चुकीमुळे, एकाच नावामुळे एका व्यक्तीला चुकीने अटक करण्यात आली होती, परंतु आता त्याची सुटका करण्यात आली आहे.












