Ajit pawar passes away : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धाडसी नेते म्हणून त्यांना ओळखले जातात. ही महाराष्ट्रासाठी आणि राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे धाडसी नेते म्हणून ओळख असलेले अजित दादा पवार बारामतीत जात असताना विमान अपघातावेळी निधन झाल्याची माहिती समोर आली. आज सकाळच्या सुमारास बारामती दौऱ्यासाठी निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात घडला. हे विमान लँडिग होत असतानाच हा अपघात झाल्याने विमानाचे अक्षरश: तुकडे झाल्याचे बघायला मिळाले. आणि याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली.
बारामती आणि त्यांच अतूट नाते होते त्याच बारामती मध्ये मृत्यू झाला- संजय राऊत
सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती मध्ये घेऊन जाणारे विमान अपघात झाल्याची बातमी समजली. दुर्दैवाने ही बातमी कानावर आली. त्यांची गरज आज महाराष्ट्राला होती मात्र आता महाराष्ट्राचे राजकारण बेचव अळणी होईल. रोखठोक दिलखुलास कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. बारामती आणि त्यांच अतूट नाते होते त्याच बारामती मध्ये मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेहमी म्हणायचे कॅबिनेट ला पूर्ण अभ्यास करून येणार नेता म्हणजे अजित पवार. शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. त्या नेत्याचा असा अकाली मृत्यू होईल असे वाटले नव्हते. असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी आत्ताच मला समजली. अजित पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, प्रशासनावरती पकड असलेले एक नेते होते. सामान्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती. दहा वर्ष मी त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम केलं होतं. त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर बोलण्याचा किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे संधी मला मिळाली होती. अजित पवारांच्या दुःखद निधनांमध्ये माझं कुटुंबीय आणि शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे सामील आहोत.
सामान्य नागरिक सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते “दादा” – विजय वडेट्टीवार
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजित दादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. पहाटेपासून कामात व्यग्र असणारे, प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते “दादा” होते. एकदा शब्द दिला की ते काम पूर्ण करणारे, प्रामाणिक आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले होते.












