State Election Commissioner Dinesh Waghmare reviewed the situation : सध्या राज्यात स्थानिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १२ जिल्ह्यात शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज रायगड जिल्यातील अलिबाग मधील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
हेही वाचा – शिंदे सेना की इस्लाम पार्टी मालेगावात कोणाचा होणार महापौर, फोडाफोडीचे राजकारण सुरू
मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड, वरसोली, सेंट मेरी हाय स्कूल मतदान केंद्रे तसेच नेहुळी येथील मतमोजणी केंद्र,साहित्य वितरण केंद्र, स्ट्राँग रूमची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रविंद्र शेळके, अलिबाग निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज
मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज असून प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर,प्रथमोपचार किट, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी बैठक व्यवस्था आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींचीही पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती यावेळी दिनेश वाघमारे यांच्याकडून देण्यात आली.
मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा – दिनेश वाघमारे
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप व भयमुक्त वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करत मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. आपल्या गाव आणि शिवाराच्या उज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे, असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.












