Fadnavis emotional : विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालंय. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला. यावेळी अजितदादांचं काम, त्यांचा स्वभाव, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, वैयक्तिक पातळीवरील मैत्री या सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं. या शोकप्रस्तावाच्या अखेरीस फडणवीसांनी कवी पी. सावळाराम यांच्या एका गीतेतील कडवं म्हणून दाखवलं. ‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला..’ या ओळी त्यांनी अजितदादांसाठी समर्पित केल्या. यावेळी फडणवीस सभागृहात काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा – शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट, काय म्हणाले डाॅक्टर वाचा सविस्तर…
संपूर्ण कोविड काळात सरकारची बाजू योग्य प्रकारे मांडली
“कोविडच्या संकटात दादा पूर्णपणे मैदानात होते. आपल्याला कल्पना आहे की, त्या काळात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण खंबीरपणे राज्याचे अर्थमंत्री म्हणून आणि त्याहीपलीकडे ही आपली जबाबदारी आहे असं समजून संपूर्ण कोविड काळात सरकारची बाजू योग्य प्रकारे मांडली. सरकारचे निर्णय योग्य होतील या दृष्टीने काम केले, या सगळ्या गोष्टी दादांनी केल्यात. त्यामुळे मी असं म्हणेन की महाराष्ट्राने एक नेता गमावला, एक प्रशासक गमावला. मी वैयक्तिक एक मित्र गमावला, असं फडणवीस म्हणाले.
दादांसारखे काम करणं, सर्व राजकीय नेत्यांनी शिकण्यासारखं आहे
आपण सगळ्यांनीच, ज्यांना आपण एक कुटुंब समजत होतो, अशी कुटुंबातील एक व्यक्ती आपण गमावली आहे. साखर कारखानदारीच्या क्षेत्रात, सहकारक्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आपण सर्वांनी बघितलं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आपण पाहिलं आहे. प्रत्येक गोष्टी अजितदादांचा ठसा पहायला मिळतो. अशा प्रकारे काम करणं हे राजकीय नेत्यांनी शिकण्यासारखं आहे,” अशा शब्दांत फडणवीस व्यक्त झाले.
‘जनसेवेचं बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून
“आज दादा आपल्यात नाहीत. आता आपल्याजवळ त्यांच्या स्मृतीच राहणार आहेत. कवी पी. सावळाराम यांचं एक गीत आहे. त्यातलं एक कडवं हे केवळ अजित दादांसाठीच लिहिलं गेलं का, असं वाटावं असं आहे. ‘जनसेवेचं बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्जुन आपुले हृदसिंहासन, नित् भजतो मानवतेला, जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला.. असं हे कडवं आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.












