Navale Bridge Accident : पुण्यातील कात्रज-देहू रोड बाह्यवळण मार्गावरील कुप्रसिद्ध ‘नवले पूल’ पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे. एका भीषण अपघातात भरधाव ट्रकने अनेक वाहनांना चिरडले असून, यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या ४८ तासांतील ही दुसरी मोठी घटना असल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासन फक्त मृतांचे आकडे मोजणार की ठोस उपाययोजना करणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कात्रज बोगद्याकडून सातारा-मुंबई महामार्गावरून एक अवजड ट्रक अतिशय वेगाने पुण्याच्या दिशेने येत होता. नवले पुलाजवळील नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ पोहोचताच चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा वेग इतका जास्त होता की, समोर सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना बाजूला होण्याची संधीच मिळाली नाही.
हेही वाचा – इराणकडून मैत्रिचा हात! भारतीय ध्वज असेल्या दोन टँकर हार्मुझ सामुद्रधुनीमधून सुरक्षित
दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू
या अनियंत्रित ट्रकने समोर असलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर सलग ५ ते ६ चारचाकी गाड्यांना चिरडत पुढे गेला. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच अंत झाला. इतर कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बचाव पथकाने तातडीने धाव घेऊन अडकलेल्या प्रवाशांना बाहेर
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गाड्यांचे पत्रे कापले गेले होते, काचांचा खच पडला होता आणि ऑईल रस्त्यावर पसरले होते. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने धाव घेऊन अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ते पोलीस आणि वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली, मात्र या प्रक्रियेत महामार्गावर सुमारे २-३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कात्रज बोगद्यापासून नवले पुलापर्यंत सुमारे ७-८ किलोमीटरचा तीव्र उतार
नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची कारणं आता चर्चेत येऊ लागली आहेत, कात्रज बोगद्यापासून नवले पुलापर्यंत सुमारे ७-८ किलोमीटरचा तीव्र उतार आहे. अनेक ट्रक चालक इंधन वाचवण्यासाठी या उतारावर गाडी न्यूट्रल करतात. यामुळे गाडीचा वेग अनियंत्रित होतो आणि ऐनवेळी ब्रेक लागत नाहीत. अवजड वाहनांचे ब्रेक सततच्या वापरामुळे गरम होतात आणि काम करणे बंद करतात.
चुकीच्या पद्धतीने होणारे मिक्सअप अपघातांना निमंत्रण
सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येणारी वाहने आणि मुख्य महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे चुकीच्या पद्धतीने होणारे मिक्सअप अपघातांना निमंत्रण देते. येथे रंबल स्ट्रिप्स, स्पीड गन आणि ब्लिंकर लावले असले तरी, ते वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत तोकडे पडत आहेत.
गेल्या ५ वर्षांत येथे ३०० हून अधिक छोटे-मोठे अपघात
नवले पूल आणि नऱ्हे परिसर हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डनुसार सर्वात मोठा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. आकडेवारीनुसार गेल्या ५ वर्षांत येथे ३०० हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली होती, ती घटना आजही पुणेकरांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.
रस्ते प्राधिकरण आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त
नवले पुलावर अपघात झाला की नेते येतात, पाहणी करतात आणि आश्वासनं देऊन निघून जातात. पण प्रत्यक्ष काहीच बदलत नाही, अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त आहेत. तांत्रिक ऑडिटचे अहवाल धुूळ खात पडून आहेत आणि इकडे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत.
नवले पुलाचे रूपांतर ‘मृत्यूच्या सापळ्यात’ होणे हे आधुनिक पुण्याचे अपयश
तज्ज्ञांच्या मते, केवळ दंड आकारून किंवा गतीरोधक लावून हा प्रश्न सुटणार नाही. ग्रेड सेपरेटर किंवा उड्डाणपुलाचे पुनर्निर्माण करण्यात यावं, जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असावी. जर एखाद्या ट्रकचे ब्रेक फेल झाले, तर त्याला थांबवण्यासाठी परदेशांप्रमाणे ‘सँड ट्रॅप’ किंवा ‘अरेस्ट बेड’ची सोय उतारावर करणे आवश्यक आहे. जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हाय-टेक कॅमेरे आणि सतत गस्त हवी. आजचा अपघात ही केवळ एक बातमी नाही, तर ती प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. नवले पुलाचे रूपांतर ‘मृत्यूच्या सापळ्यात’ होणे हे आधुनिक पुण्याचे अपयश आहे. जोपर्यंत येथे ठोस अभियांत्रिकी बदल केले जात नाहीत, तोपर्यंत निष्पाप जीवांची ही आहुती थांबणार नाही.












