CM Samrat Chaudhary | बिहारचे नवे मुख्यमंत्री (Bihar New CM) म्हणून शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी (CM Samrat Chaudhary) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सम्राट चौधरी हे पहिल्या दिवशी मुख्य सचिवालयात पोहोचले जिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य सचिवालयातील सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुम्ही सर्वजण पूर्ण समर्पण आणि निष्ठेने काम करत आहात. मला तुम्हा सर्वांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. राज्य सरकारचा मंत्री म्हणून विविध विभागांमध्ये काम करताना मी तुम्हा सर्वांच्या संपर्कात राहिलो आहे. अर्थमंत्री म्हणून मला राज्याची आर्थिक व्यवस्था जवळून समजून घेण्याची संधीही मिळाली आहे.
हेही वाचा – “नेत्यांची भाटगिरी करणे थांबवा…”, खरात प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा अदिती तटकरेंवर हल्लाबोल, राजकीय वाद पेटला
मुख्यमंत्री सम्राट चौधरी पहिल्याच दिवशी लागले कामाला
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. ते म्हणाले की, बिहारमध्ये जी काही कामे सुरू आहेत ती चांगल्या प्रकारे पार पाडली जात आहेत. तुम्हा सर्वांनी कामाचा वेग वाढवला पाहिजे. दुप्पट वेगाने काम केल्यास समस्या अधिक लवकर सुटतील. राज्यातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपल्याला शून्य सहिष्णुतेच्या धोरणावर पूर्ण निर्धाराने काम करावे लागेल. वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री चौधरी यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना नेमके काय दिले निर्देश?
पुढे ते म्हणाले की, सध्या राज्य सरकारने तयार केलेल्या योजनांवर काम सुरू आहे, परंतु त्यांची वेळेवर अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. मुख्यालय स्तरापासून ते खालच्या स्तरापर्यंत कुठेही कामाला विलंब करण्याची प्रवृत्ती असू नये. केवळ फायलींची संख्या वाढवण्याची आणि पत्रे लिहिण्याची प्रवृत्ती असू नये, असंही मुख्यमंत्री चौधरी म्हणाले.
सार्वजनिक समस्या त्वरित सोडवल्या जाव्यात, ही आपली प्रवृत्ती असायला हवी. कोणत्याही विभागात जनतेशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास, त्यावर त्वरित कारवाई होईल याची खात्री करावी. जमिनीच्या वादाशी संबंधित समस्या सोडवताना कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नसावी, काम सोपे करून त्या त्वरित सोडवाव्यात. 60 ते 70 टक्के परस्पर विवाद केवळ जमिनीच्या समस्यांमुळेच निर्माण होतात. जनतेला त्रास होऊ नये आणि ती आनंदी राहावी, हे लक्षात ठेवून काम केले पाहिजे. तसेच सर्वसामान्य जनतेला ब्लॉक, सर्कल आणि पोलीस ठाण्यात सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्यांच्या समस्या वेळेवर सोडवल्या पाहिजेत, असे आदेशही मुख्यमंत्री चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.











