Punjab Farmers Protest | पंजाबमधील (Punjab) शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. आजपासून तीन दिवस शेतकरी संघटना रेल्वे रोको आंदोलन (Rail Roko Protest) करणार आहेत. भारतीय किसान युनियन, किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चाशी संलग्न असलेल्या अनेक संघटनांसह, राज्यभरातील ‘रेल्वे रोको’ आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय अनेक शेतकरी गटांनी घेतला आहे. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान होऊनही नियम शिथिल करण्यास आणि गहू खरेदी पुन्हा सुरू करण्यास सरकारने नकार दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल अडकला विवाहबंधनात; बालमैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ
पंजाबमधील शेतकरी आक्रमक, थेट दिला आंदोलनाचा इशारा
या आंदोलनादरम्यान शेतकरी नेत्यांनी इशारा दिला आहे की, गहू खरेदीच्या अटी शिथिल करून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत तर 17 एप्रिल रोजी संपूर्ण पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखली जाईल. हे आंदोलन दुपारी 12 ते 3 या वेळेत होईल. शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, केएमएमच्या पंजाब युनिट, एसकेएमशी संलग्न असलेल्या पंजाबमधील पाच संघटना आणि ऑल इंडिया किसान मोर्चा यांच्या पाठिंब्याने राज्यभरातील विविध ठिकाणी हा रेल्वे रोको आयोजित केला जाईल.
आंदोलनाच्या मुख्य ठिकाणांमध्ये अमृतसर जिल्ह्यातील देवी दासपुरा, संगरूरमधील सुनम, होशियारपूर, दासुया रेल्वे स्थानके, रेल कोच फॅक्टरीजवळील हुसेनपूर, कपूरथलामधील फागवारा रेल्वे स्थानक, तसेच बरनाला, तरनतारन, मोगा, जगराओन, पतियाळा, मानसा आणि फाजिल्का येथील रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
तीन तासांच्या आंदोलनादरम्यान शेतकरी अनेक रेल्वे स्थानकांवर जमून रेल्वे सेवा विस्कळीत करण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. फिरोजपूर ते लुधियाना, लुधियाना ते जयपूर, फिरोजपूर ते दिल्ली आणि फिरोजपूर ते चंदीगड यांसारख्या मार्गांवरील रेल्वे सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा का घेतला निर्णय?
या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही, पण जेव्हा सरकारी यंत्रणा आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा आम्हाला अशी पावले उचलण्यास भाग पडावं लागतं.” पंजाबमधील शेतकरी गहू खरेदीच्या अभावामुळे संतप्त झाले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने गहू खरेदीला होणाऱ्या विलंबावर पंजाबमधील शेतकरी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या महत्त्वाच्या कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल आणि त्यांच्या शोषणाबद्दल संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबमधील केंद्रीय यंत्रणा राज्य सरकार आणि शेतकरी या दोघांसाठीही अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.







