Jay Pawar Baramati Election 2029 : तीच आय लव्ह यू म्हणण्याची स्टाईल… तोच बिन्धास्तपणा… तीच माणसांच्या गराड्यात राहण्याची सवय… तीच सर्वसामन्य माणसात उतरून प्रत्येकाला भेटून आपुलकीनं बोलणं… कॅमेऱ्यावर बोलतानाही तोच स्पष्टवक्तेपणा… तोच कामाचा सपाटा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती मोठ्या घरात जन्म झाला असला तरी पाय मात्र नेहमी जमिनीवर… जय पवारांना बघितलं की हुबेहुब अजित पवार आठवतात, कारण दादांची झलक नेहमीच जयमध्ये दिसते, दादांचं वागणं, बोलणं आणि जयची शैली काहीशी सारखीच दिसते…
त्यामुळे आता बारामतीचा कारभारी जय पवारच का? २०२९ ला बारामतीचा उमेदवार जय पवारच राहणार का? २०२९ मीच बारामतीतून लढावं अशी जनतेची इच्छा, असं जय पवार नेमकं का म्हणतायत? बरं जनतेच्या इच्छेशी त्यांचा पक्ष आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आईसाहेब… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सहमत आहेत का? त्या जयला २०२९ ला बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळणार आहेत..
‘पवार’ घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व उदयाला
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागी आता ‘पवार’ घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व उदयाला येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत नुकतेच एक अत्यंत सूचक विधान केले असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. बारामती ही पवारांचीच आणि २०२९ ला ती जय पवारांचीच असणार का, अशा चर्चांना आता अधिकृतपणे तोंड फुटले आहे.
निवडणुकीची सूत्रे आणि प्रचाराची धुरा जय पवारांच्या खांद्यावर
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत महायुतीकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. मात्र, या संपूर्ण निवडणुकीची सूत्रे आणि प्रचाराची धुरा जय पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. प्रचारादरम्यान गावोगावी होणाऱ्या घोंगडी बैठका, पदयात्रा आणि कार्यकर्त्यांशी साधला जाणारा थेट संवाद यामुळे जय पवारांची प्रतिमा एका परिपक्व नेत्यासारखी दिसून येत आहे. पत्रकारांनी जेव्हा त्यांना आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत छेडले, तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाणारे होते.
मी बारामतीतून निवडणूक लढवावी, अशी येथील जनतेची इच्छा
जय पवार म्हणाले, “सध्या माझे संपूर्ण लक्ष पोटनिवडणुकीवर आणि दादांनी सुरू ठेवलेली विकासकामे पुढे नेण्यावर आहे. मात्र, २०२९ मध्ये मी बारामतीतून निवडणूक लढवावी, अशी येथील जनतेची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे. राजकारणात जनभावना महत्त्वाची असते आणि लोकांची मागणी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.” जय पवारांच्या या एका वाक्याने बारामतीच्या आगामी राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. त्यांनी केवळ जनतेच्या मागणीचा हवाला दिला असला, तरी त्यांचे हे विधान आगामी काळात बारामती विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकण्यासारखेच आहे.
जय पवार यांच्यामध्ये कार्यकर्त्यांना दिसतोय नवा दादा
अजित पवारांच्या पश्चात बारामतीचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. पार्थ पवार हे राजकारणात आधीच सक्रिय असले तरी मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते काहीसे बॅकफूटवर गेले होते. अशा परिस्थितीत जय पवार यांनी ज्या संयमाने आणि आक्रमकतेने बारामतीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे, ती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यात नवा ‘दादा’ दिसत आहे. जय पवारांची बोलण्याची शैली, कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखण्याची हातोटी आणि कामाचा उरक यामुळे ते अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असल्याचे दिसून येते.
बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना
दुसरीकडे, शरद पवार गटाकडूनही २०२९ च्या निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी आधीच जय पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, २०२९ ची लढत ही विचारांची असेल. याचाच अर्थ आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. यावेळची पोटनिवडणूक ही जरी सुनेत्रा पवार यांच्यासाठी असली, तरी खऱ्या अर्थाने ती जय पवारांच्या नेतृत्वाचा कस लावणारी ठरत आहे.
अजित पवारांच्या तपासावर जय पवारांकडून नाराजी व्यक्त
अजित पवारांच्या अपघाताचा तपास अद्यापही सीआयडीमार्फत सुरू आहे. या तपासावरून जय पवारांनी सरकारवर आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. “तपासाला उशीर का होत आहे, हे आम्हाला समजत नाहीये,” असे म्हणत त्यांनी आपल्या पित्याच्या निधनाबद्दल असलेले दुःख आणि त्यामागचे गूढ लोकांसमोर मांडले आहे. या भावनिक मुद्द्याचाही मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या युवा नेतृत्वाच्या उदयाची नांदी
बारामतीचं गणित फक्त चेहऱ्यावर ठरत नाही, तर बारामतीच्या विकासाचा इतिहास, अजितदादांचे योगदान आणि जय पवारांसमोर असलेली आव्हाने यांचाही समावेश होतो. बारामतीकरांसाठी पवार घराणे हे केवळ राजकीय घराणे नसून ते एक श्रद्धास्थान आहे. जय पवार हे याच श्रद्धेला विकासाची जोड देऊन २०२९ चा गड सर करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी दिलेले थेट संकेत हे केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या युवा नेतृत्वाच्या उदयाची ती नांदी आहे.
येणाऱ्या काळात जय पवार आपली ही पकड कशी कायम राखतात आणि जनतेचा हा कौल मतांमध्ये कसा रूपांतरित करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण सध्या तरी बारामतीच्या आखाड्यात जय पवारांच्या नावाचा डंका वाजू लागला आहे आणि २०२९ च्या विजयाचा पाया त्यांनी आत्ताच रचायला सुरुवात केली आहे, हे मात्र निश्चित.












