Bhandara Accident | भंडाऱ्यात (Bhandara) एक दु:खद घटना घडली आहे. लग्नात मज्जा-मस्ती करून आनंदाने घरी परतत असताना एका वऱ्हाडाच्या गाडीवर काळाने घाला घातला. वऱ्हाडाच्या गाडीला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात (Accident) झाला. या अपघातत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं भंडाऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, नागपूर कनेक्शन उघड
अपघात नेमका कसा घडला?
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. कोंढा कोसरा येथून लग्न आटोपून वऱ्हाड परत येत होतं. यादरम्यान एका भरधाव ट्रकने वऱ्हाडाच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात 4 महिलांचा आणि एका पुरूषाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
लग्न झाल्यानंतर वऱ्हाडी लोकं मारूती ओमनी व्हॅनने घरी परत येत होते. यावेळी एका अज्ञात ट्रकने ओमनीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अमोनीचा टायर फुटला आणि गाडीचा जागीच चक्काचूर झाला. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर जखमी लोकांनी जोरदार आक्रोश करत टाहो फोडला. जखमींचा आक्रोश ऐकून गावकऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीनं शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या अपघाताची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तर सध्या पोलीस या अपघाताचा कसून तपास करत आहेत. सध्या ट्रक चालक हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वऱ्हाडाच्या गाडीचा झालेल्या या अपघाताने भंडाऱ्यात शोककळा पसरली आहे. धुमधडाक्यात लग्न आटोपून परतीच्या वाटेवर परतताना काळाने गाठल्याने गावकऱ्यांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. तसेत या अपघाताने भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.












