अकोला Heatwave in Akola : नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रानं 29 एप्रिल ते 3 मे या कालावधीत अकोला जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात अचानक पावसाची शक्यता आहे. या संदर्भात, जिल्हा प्रशासनानं नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात तीव्र उष्णता आणि अचानक पावसाची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नागरिक आणि कामगारांना सतर्क राहण्याचे, आरोग्याची काळजी घेण्याचे आणि सुरक्षा उपायांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. हवामानाची स्थिती या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ ब्लॉकबस्टर आधीच? रिलीजपूर्वीच 193 कोटींचा बिझनेस
दुपारी घरबाहेर न पडण्याचं आवाहन :
प्रशासनानं नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे टाळण्याचा इशारा दिला आहे. जास्त तापमानात शारीरिक श्रमाची कामे टाळा आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहा. मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद वाहनांमध्ये सोडू नका. आरोग्यविषयक खबरदारी, जसं की तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्या. डोकेदुखी, अशक्तपणा, जास्त घाम येणं किंवा चक्कर येणं यांसारखी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पशुधन आणि पाळीव प्राण्यांना निवाऱ्यात ठेवा आणि त्यांना पुरेसं पाणी द्या. वीज, वारा आणि पावसापासून संरक्षण: जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. झाडांखाली उभं राहू नका. अकोला: पाऊस आणि वीज पडत असताना मोबाईल फोन वापरू नका.
शेतकऱ्यांना शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला :
उष्णतेच्या लाटेमुळं बांधकाम कामगार, विटभट्टी कामगार, खाण कामगार, शेतकरी आणि असंघटित क्षेत्रातील कामगार या गटांना सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनानं या कामगारांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. कामाच्या ठिकाणी पुरेशी सावली आणि विश्रांतीची जागा उपलब्ध करून द्यावी. जड काम दिवसाच्या थंड वेळेत करण्यासाठी कामाच्या वेळांचे पुनर्नियोजन करावे. पुरेसे पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स आणि आपत्कालीन बर्फाचे पॅक उपलब्ध करून द्यावेत. कामगारांची नियमित आरोग्य तपासणी सुनिश्चित करावी.
अत्यधिक उष्णतेत कामगारांना कामाचा वेग कमी करण्याची परवानगी द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी कामाच्या ठिकाणी दोन व्यक्तींचा चमू अनिवार्य करावा. कामगार आणि नागरिकांना उष्णतेच्या लाटेच्या धोक्यांबद्दल जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी.








