Cousin harassment suicide case : माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचे एक भयानक उदाहरण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात समोर आले आहे. ज्या भावावर बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी असते, त्याच चुलत भावाच्या छळामुळे एका विवाहित तरुणीला आपले जीवन संपवावे लागले. अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील ऋतुजा लोणे या तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
मानसिक त्रासाला आणि सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या
लोणी खुर्द येथील ऋतुजा लोणे हिचे लग्न झाले होते. ती आपल्या सुखी संसारात रमलेली असताना, तिचा चुलत भाऊ प्रफुल लोणे हा तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. प्रफुल हा ऋतुजाला वारंवार प्रेमासाठी त्रास देत होता. “तुझे लग्न झाले असले तरी आपण दोघे पळून जाऊ आणि लग्न करू,” असा तगादा त्याने तिच्याकडे लावला होता. रक्ताच्या नात्यातील भावाकडूनच असा विकृत प्रस्ताव वारंवार येत असल्याने ऋतुजा प्रचंड मानसिक तणावाखाली होती. अखेतिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा मार्ग अवलंबला. भावाच्या या मानसिक त्रासाला आणि सततच्या छळाला कंटाळून ऋतुजाची सहनशक्ती संपल्याने तिने हा मार्ग जवळ केला.
गावातीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
समाजातील बदनामीची भीती आणि नात्यातील या विद्रूपतेमुळे हतबल झालेल्या ऋतुजाने गावातीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. एका तरुण मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर ऋतुजाच्या वडिलांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रफुल लोणे विरोधात तक्रार दाखल केली. आपल्या मुलीच्या मृत्यूला तिचा चुलत भाऊच जबाबदार असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणाचा सखोल तपास करताना पोलिसांनी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे प्रफुल लोणे हा ऋतुजाला त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले. सबळ पुरावे हाती लागताच पोलिसांनी प्रफुल लोणे याला अटक केली आहे.
कौटुंबिक नात्यातील नैतिकतेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. “नात्याला काळिमा फासणाऱ्या अशा विकृत तरुणाला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेचा आणि कौटुंबिक नात्यातील नैतिकतेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ऋतुजाच्या मृत्यूने एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











