Union Minister's son booked under POCSO: सध्या देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, मुला-मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणांनी चिंता वाढवली आहे. अशातच तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका बड्या मंत्र्याच्या मुलावर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांचे पुत्र बंडी भगीरथ यांना शनिवारी, १६ मे रोजी तेलंगणा पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत अटक केली आहे. या कारवाईपूर्वी
तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत ही अटक केली.
या प्रकरणाची सुरुवात ८ मे रोजी झाली, जेव्हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याच्यावर लुकआउट सर्क्युलरही जारी कारण्यात आले होते.
FIR मध्ये
FIR मधील आरोपांनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तसेच जबरदस्तीने दारू पाजणे आणि गैरवर्तन केल्याचेही गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि POCSO कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्रति- तक्रार दाखल
दुसरीकडे, आरोपी बंडी भगीरथ यांनी हे सर्व आरोप फेटाळत पोलिसांत प्रति- तक्रार (Counter Complaint) दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मुलगी त्यांना स्वतःहून कौटूंबिक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये बोलावत होती.
तसेच, त्यांच्या दाव्यानुसार मुलीच्या कुटुंबीयांकडून त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता आणि ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया
या अटकेपूर्वी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, कायदा आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखत संबंधित मुलाला वकिलांच्या माध्यमातून स्वतःहून पोलिसांसमोर हजर करण्यात आले होते.
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, भगीरथ याच्याविरुद्धचे आरोप खोटे असल्याचे पुरावे वकिलांकडे सादर करण्यात आले असून हा खटला न्यायालयात फेटाळला जाईल आणि जामीन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शरण येण्यास काहीसा विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळत ही अधिकृत अटक असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकीय वातावरण तापले
दरम्यान, या प्रकरणानंतर तेलंगणामध्ये राजकीय वातावरण तापले असून विविध ठिकाणी निदर्शने आणि विरोध प्रदर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे.
सध्याची स्थिती
या पार्श्वभूमीवर तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) च्या नेत्या के. कविता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी आणि संबंधित मंत्र्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.












