Supriya Sule | पुण्यात (Pune) आजपासून (26 मे) ते 8 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात महागाई विरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरत आहेत. तसेच आता बकरी ईद हा सणही जवळ आल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास 14 दिवस पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतप्त होत पोलीस प्रशासनाला थेट सवाल केले आहेत.
हेही वाचा – बकरी ईदपूर्वी मीरा रोडवर हिंदू-मुस्लिम आमनेसामेन; ब्लेडने हल्ला करत दोन गटात हाणामारी, नेमकं कारण काय?
जमावबंदीबाबत नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळेंनी त्यांच्या अधिकृत एक्स शोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे त्या म्हणाल्या की, एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे.गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत?
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले…
— Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2026
पोलीस आयुक्त, जमावबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे, अशी खोचक टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे.










