सचिन राणे | वाशिम प्रतिनिधी
Dattatray Bharne : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी म्हणून सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या याद्यांवर कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकारने अद्याप कोणत्याही दुष्काळग्रस्त जिल्ह्याची किंवा तालुक्याची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या याद्या फेक आहेत, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या भरणे यांनी जिल्ह्यातील विविध भागांत शेतांच्या बांधावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी म्हणून काही कागदपत्रे आणि याद्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. मात्र, या याद्या शासनाच्या अधिकृत नसल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच अशा बनावट याद्या तयार करून प्रसारित करणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पावसाअभावी खरीप हंगाम अडचणीत ( Washim Drought News )
वाशिम जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड पडल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकासोबत मोठी स्वप्ने रंगवली होती; मात्र पावसाअभावी त्याचा चक्काचूर झाला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे भरणे यांनी सांगितले. हे संकट मानवनिर्मित नसून निसर्गामुळे निर्माण झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एनडीआरएफ, राज्य सरकारचा निधी आणि पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही भरणे यांनी सांगितले.
हेही वाचा : AI मुळे पाणीटंचाईचा धोका? ChatGPTच्या वापरामागे किती पाणी खर्च
‘नियम-निकष बाजूला ठेवून मदतीचा प्रयत्न’ ( Dattatray Bharne )
मुख्यमंत्री यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन दिल्याचे भरणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा कृषिमंत्री या दोन्ही जबाबदाऱ्या असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
पीक विम्याच्या ‘ट्रिगर’मध्ये सुधारणा करणार
मागील वर्षी पीक विम्याच्या ‘ट्रिगर’ प्रक्रियेत शेतकऱ्यांना काही अडचणी आल्याचे भरणे यांनी मान्य केले. यामध्ये आवश्यक सुधारणा करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आला असला तरी आत्महत्या हा पर्याय नसल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि या संकटाचा सामना करावा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









