• Home
  • महाराष्ट्र
  • अ‍ॅसिड ‘ती’च्या तोंडावर परंतु, चेहरा विद्रुप झाला सरकारचा अन् त्या गृह विभागाचा…
Top News

अ‍ॅसिड ‘ती’च्या तोंडावर परंतु, चेहरा विद्रुप झाला सरकारचा अन् त्या गृह विभागाचा…

Acid Attack

Hideous Face : काल-परवा म्हणे ‘ती’ला घरातून उचलून नेऊन कुणीतरी अत्याचार केला कुणाला काय फरक पडतो? काल-परवा तिला घरात बोलावून कुणीतरी तिच्यावर अत्याचार केला, कुणाला काय फरक पडतो? काल-परवा कुणीतरी तिच्यावर चाकूहल्ला केला, कुणाला काय फरक पडतो? काल-परवा म्हणे कुणीतरी तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला, कुणाला काय फरक पडतो? यातलं जे कुणाला काय फरक पडतो? हे वाक्य ऐकून काळजात धस्स होतं. काल एका सहावीत शिक्षण घेत असलेल्या चिमुकली अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना कानावर पडली अन् गळजात चर्कन खोलवर जखम झाली. या घटनेमुळे एक मात्र नक्की झालं. या अ‍ॅसिड हल्ल्यात सरकारचा आणि गृह विभागाचा नाकरतेपणाचा विद्रुप जेहरा समोर आला.

कायदा-सुव्यवस्थेच्या आक्षरषः चिंध्या-चिंध्या झाल्यात

तिच्यावर हे असे अमानुष अत्याचार होत असताना खरंच कुणाला काहीच फरक पडत नाही का हो? हा एकच सवाल आज साऱ्या महाराष्ट्राला सतावतोय… तो म्हणजे या महाराष्ट्रात आया-बहिणींनी, पोरी-बाळींनी जगायचं की नाही? षंढासारखं कडिचूप असलेलं हे गृहखातं आणि हे सरकार महाराष्ट्राची अभ्रू रस्त्यावर मांडत आहे त्याच काय? त्यामुळं असं वाटायला लागलंय महाराष्ट्राचा आता बिहार झालाय. आपण गुन्हेगारीमुळे बिहारला बदनाम करतोय, पण या महाराष्ट्रात तरी कोण सुरक्षित आहे? राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या आक्षरषः चिंध्या-चिंध्या झाल्यात.

निर्लज्जम सदा सुखी त्यातलाच हा प्रकार

अलिकडं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्यात. कुणी ओळखीचा फायदा घेऊन, कुणी आमिष दाखवून, कुणी फूस लावून पळवून नेऊन, तर कुणी राजरोसपणे घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केला जातोय. हे विकृत, वासनांध नराधम इथवरच थांबत नाहीत तर अत्याचार करून झाल्यानंतर तिला चावडीवरच्या खांबाला बांधून निघूनही जातात? अत्याचार, हत्या, हल्ला हे शब्द सध्या महाराष्ट्रात वारंवार कानावर पडतायत. त्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारानं तर परिसीमा गाठलीये. मात्र, हे षंढ सरकार काय ठोस पावलं उचलायला तयार नाही. फक्त अन् फक्त राजकारण चालू आहे. जनतेची दिशाभूल चालूय, आश्वासनांची खैरात वाटायचे चालूय. ते म्हणतात ना निर्लज्जम सदा सुखी त्यातलाच हा प्रकार म्हणावं लागेल.

आज महाराष्ट्रातली महिला दीन झालीये

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दररोज कुठं ना कुठं तरी आया-बहिणींना अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. महिला दिन जो काही म्हणतात तो याच महिन्यातला! पण आज महाराष्ट्रातली महिला दीन झालीये. दीन मधला ‘द’ ऱ्हस्व नाही दीर्घ बरं का! कालची संगमनेरमधली घटना ऐकून तर डोकं सुन्न झालं. सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर अ‍ॅसिड हल्ला? सुदैवानं ती वाचली खरी पण या हल्ल्यात भाजून निघालेल्या तिच्या चेहऱ्याचं काय? ते अ‍ॅसिड अंगावर पडल्यानंतर तिला झालेल्या त्या वेदनांचं काय?

हृदयात खोलवर झिरपलेल्या अ‍ॅसिडचं काय?

आज-उद्या ती हॉस्पिटलमधून बरी होऊन घरीही येईल, कालांतरानं तिच्या चेहऱ्यावरील जखमांचे व्रण पुसलेही जातील पण तिच्या हृदयात खोलवर झिरपलेल्या या भीतीरूपी अ‍ॅसिडचं काय? ते मात्र तिला आतल्या आत जाळत राहील आणि त्या भीषण हल्ल्याची परत परत आठवण देत राहील त्याचं काय? आज ना उद्या त्या नराधमाला अटक होईल हो पण हा हल्ला प्रत्यक्ष झेलणारी ‘ती’, तिचं काय? अ‍ॅसिड ‘ती’च्या तोंडावर पडलं हो, परंतु चेहरा सरकारचा विद्रुप झाला त्याचं काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts