Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. येत्या २९ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत.
अंतरवाली सराटी येथून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, १२ ऑगस्टपर्यंत ते पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यात जरांगे पाटील मराठा समाज बांधवांशी थेट संवाद साधणार असून, आगामी आंदोलनासाठी जनसमर्थन उभे करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे आक्रमक ( Manoj Jarange Patil )
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात चार लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.
या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला होता.
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन
मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात विविध जिल्ह्यांमध्ये समाज बांधवांच्या बैठका आणि भेटीगाठी होणार आहेत.
7 ऑगस्ट: अंतरवाली सराटी येथून दुपारी 12 वाजता प्रस्थान. त्यानंतर तुळजापूर येथे समाज बांधवांशी संवाद आणि मुक्काम.
8 ऑगस्ट: सकाळी वडाळा (उत्तर सोलापूर) येथे बैठक, दुपारी माढा येथे संवाद. त्यानंतर पंढरपूर येथे दर्शन आणि मुक्काम.
9 ऑगस्ट: सकाळी सारकोली (ता. पंढरपूर) येथे बैठक, दुपारी सांगोला येथे भेटीगाठी. सायंकाळी आटपाडी येथे मुक्काम.
10 ऑगस्ट: कवठे महांकाळ, बोरगाव (ता. वाळवा) येथे बैठका आणि भेटीगाठी. रात्री कडेगाव येथे मुक्काम.
11 ऑगस्ट: मायणी (ता. खटाव), मसूर (ता. कराड) येथे संवाद. कराड येथे मुक्काम.
12 ऑगस्ट: पाटण येथे भेटीनंतर दुपारी सातारा येथे दौऱ्याचा समारोप.
आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यावर त्यांचा भर असणार आहे.









