JP Nadda Meeting CJP: जेपी नड्डा यांच्यासोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर CJP ने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने स्पष्ट केले आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा देईपर्यंत पक्षाचे आंदोलन सुरूच राहील. पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या दीर्घ बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी CJP चे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी जेपी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. जवळपास चार तास चाललेल्या चर्चेनंतरही सरकारकडून कोणतेही अश्वासन किंवा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे पक्षाने या चर्चेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: आषाढ महिन्यात काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या धार्मिक आणि पारंपरिक महत्व एका क्लिकवर
प्रसारमाध्यमांशी बोलताना आशुतोष रांका म्हणाले की,”सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे आणि जंतर- मंतरवरील आमचे आंदोलनही कायम आहे. आजची बैठक कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. आता सरकारने थेट पुढाकार घेऊन चर्चा करावी. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही.”
CJP च्या प्रमुख मागण्या
बैठकीनंतर रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्सवर माहिती देताना सांगितले की, जेपी नड्डा यांनी पक्ष नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. पक्षाच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
१. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची सुटका.
२. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
३. आत्महत्या केलेल्या सर्व NEET उमेदवारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत
सोनम वांगचुक यांचे उपोषण कायम
रुग्णालयातून संदेश देताना सोनम वांगचुक यांनी सांगितले की, तरुण प्रतिनिधींना खासदारांशी भेट घेण्याची संधी मिळेपर्यंत किंवा खासदारांनी स्वतः रुग्णालयात येऊन संवाद साधेपर्यंत ते उपोषण सुरू ठेवतील.
‘संसद चलो’ आंदोलनात तणाव
दिल्लीत सोमवारी CJP आणि त्यांच्या समर्थकांनी ‘संसद चलो’ आंदोलन केले. NEET- UG प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी त्यांची मागणी होती. संसद भावनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी निर्दशकांना रोखले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
हे आंदोलन NEET- UG पेपर लीक प्रकरणासह विविध परीक्षांमधील कथित अनियमिततांविरोधात असून, या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे.









