Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. विभागाचे आयुक्त आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आता विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या (Food and Drug Administration Maharashtra) राज्य प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी निवेदन देत आपल्या अडचणी मांडल्या आहेत. या निवेदनामुळे प्रशासनिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: अजिंक्य राहणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप; भावूक व्हिडीओ शेअर करत केली निवृत्तीची घोषणा
अधिकाऱ्यांनी कोणते आक्षेप घेतले?
तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध भेसळीविरोधात कारवाईचा वेग वाढवल्यानंतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढली आहे. प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी प्रयोगशाळेत कामकाजात बदल करण्यात आल्याचे सांगितले जाते. (Latest Maharashtra News)
मात्र, हे बदल करताना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
१. दोन शिफ्टमध्ये कामाचा निर्णय
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये काम करण्याची पद्धत लागू करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळपासून रात्री उशीरपर्यंत काम करावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
२. सुट्ट्यांबाबत नाराजी
शनिवार- रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही काम करण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि कौटूंबिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
३. मनुष्यबळ आणि सुविधांचा अभाव
प्रयोगशाळेतील काही तांत्रिक पदे रिक्त असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आवश्यक सुविधा आणि संसाधनांची कामरता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
४. तपासणीच्या गुणवत्तेबाबत चिंता
अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी ठराविक वैज्ञानिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, कामाचा मोठ्या प्रमाणात वेग वाढवण्याच्या दबावामुळे तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांनी काही मागण्या केल्या आहेत:
दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय मागे घ्यावा.
पूर्वीप्रमाणे नियमित कार्यालयीन वेळ लागू करावी.
सुट्ट्यांच्या दिवशी सक्तीचे काम टाळावे.
अतिरिक्त कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.
नियमानुसार भत्ते आणि सुविधा द्याव्यात.
नमुना तपासणी करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये.
मुंढेंच्या कारवाईचे कौतुक आणि नाराजी दोन्ही
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न आणि औषध भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात अनेक कारवाया केल्या आहेत. त्यांच्या कठोर निर्णयांचे काही स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.
नाराजी व्यक्त
मात्र, विभागातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेल्या ताणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या निवेदनावर मंत्री नरहरी झिरवाळ आणि प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर न्यायालयानेही काही मुद्दे उपस्थित केले असून, सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील विभागासमोर सध्या प्रशासकीय आणि न्यायालयीन अशा दोन्ही पातळ्यांवर आव्हाने उभी राहिली आहेत.









