Rahul Gandhi Criticizes Modi : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक तेलाच्या किंमतीतील वाढ यामुळे भारताच्या विदेशी मुद्रा साठ्यावर दबाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी हैदराबादजवळील सेकंदराबाद येथील सभेत जनतेला ‘राष्ट्रहितासाठी त्याग’ करण्याचे आवाहन केले. सोने खरेदी टाळणे, परदेशी पर्यटन स्थगित करणे, पेट्रोल-डीझेलचा वापर कमी करणे, मेट्रो प्रवास वाढवणे, घरून काम करणे यासारख्या उपायांचा समावेश या आवाहनात होता. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोंदींवर निशाना साधला आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री होण्यापूर्वीच CM विजयने दिला विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा
“आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करावा लागेल. शहरांमध्ये मेट्रो आहे तेथे मेट्रोने प्रवास करा. लग्नकार्यांसाठी एक वर्ष सोने खरेदी करू नका. हे राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. जागतिक ऊर्जा संकट आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय लक्षात घेता विदेशी चलण बचत करणे ही राष्ट्रीय जबाबदारी आहे. यावर काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल यांधी यांनी खरमरीत टीकास्त्र डागले आहे.
१२ वर्षांच्या कारकिर्दीतील अपयशाचे स्पष्ट संकेत
“मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत अर्थव्यवस्थेच्या अपयशाचे हे स्पष्ट संकेत आहेत. हे उपदेश नाहीत, हे अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी देशाला अशा परिस्थितीत आणले आहे की, जनतेला सांगावे लागते. काय खरेदी करावे, काय करू नये. कुठे जावे, कुठे जाऊ नये. प्रत्येक वेळी ते जबाबदारी जनतेवर ढकलतात, जेणेकरून ते स्वतः जबाबदारीतून सुटू शकतील,” असं ट्विट करत त्यांनी टीका केलीय.
देश चालवणे मोंदीच्या आवाक्यात आता राहिले नाही
“आता देश चालवणे ‘तडजोड केलेल्या’ पंतप्रधानांच्या आवाक्यात राहिला नाही. जनतेला त्यागाची मागणी करणे हे सरकारच्या धोरणात्मक अपयशाचे लक्षण आहे. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक दबाव यांचा सामना करण्याऐवजी सरकार जनतेवर जबाबदारी देऊन स्वतः मोकळे होत आहे.” काँग्रेसने या आवाहनाला ‘जनतेवर भार लादणे’ असे संबोधले आणि सरकारला आर्थिक व्यवस्थापनात अपयश आल्याचे आरोप केलेत.
राजकीय प्रतिक्रिया आणि अर्थशास्त्रीय संदर्भ
मोदींच्या आवाहनाने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. भाजप समर्थकांनी याला ‘राष्ट्रप्रेम आणि जागतिक संकटात एकजूट’ असं म्हटलंय, तर विरोधकांनी याला ‘अर्थव्यवस्थेच्या दिवाळखोरीचे प्रतीक’ ठरवलंय. भारत जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि लग्नांच्या हंगामात सोन्याची मागणी मोठी असते. तसेच, भारत आपल्या तेलाच्या गरजेचा ८५ टक्क्यांहून अधिक भाग आयात करतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विदेशी चलण साठ्यावर दबाव वाढला आहे, असं अर्थशास्त्रज्ञांचं मतं आहे.












