Asha Bhosle Passes Away | प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं रविवारी दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण जगभरात शोककळा पसरली आहे. तसेच आशा भोसले यांच्या निधनाचे सावट फक्त भारतातच (India) नाही तर पाकिस्तानमध्ये (Pakistan) देखील उमटले आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून तेथील ‘जिओ न्यूज’ (Geo News) चॅनेलला नोटीस पाठवण्यात आली आहे.
हेही वाचा – “चाकणकर किती खोटं बोलता…”, अंजली दमानियांचा हल्लाबोल, थेट अशोक खरातसोबतचे कॉल डिटेल्स केले उघड
आशा भोसले यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये का झाला वाद?
पाकिस्तानमधील आघाडीचा न्यूज चॅनेल ‘जिओ न्यूज’ला महान गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहणे महागात पडले आहे. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी देताना त्यांची गाणी आणि भारतीय चित्रपटांमधील काही दृश्ये दाखवल्याबद्दल पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (PEMRA) ‘जिओ न्यूज’ला थेट नोटीस बजावली आहे. 2018 पासून पाकिस्तानामध्ये भारतीय चित्रपट, गाणी आणि इतर मजकूर प्रसारित करण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे आता जिओ न्यूज चॅनलच्या अडचणीत वाढ झाली आहे.
‘जिओ न्यूज’ला का पाठवली नोटीस?
जिओ न्यूजने आशा भोसले यांच्या निधनाची बातमी देताना त्यांच्या काही अजरामर गाण्यांचा वापर केला. यावेळी भारतीय चित्रपटांमधील काही दृश्ये देखील दाखवण्यात आली. त्यामुळे पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने ‘जिओ न्यूज’ला थेट नोटीस बजावली असून हा प्रकार “न्यायालयाचा जाणीवपूर्वक केलेला अवमान” असल्याचं पेमराने म्हटलं आहे. तर आता या प्रकरणी जिओ न्यूजच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 27 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चॅनेलचे निलंबन, दंड आणि परवाना रद्द करण्याची तरतूद पेमराच्या नियमावलीत करण्यात आली आहे. त्यामुळे जिओ न्यूजला आशा ताईंच्या निधनाची बातमी देणं चांगलंच महागात पडलं आहे.
पेमराच्या नोटिसीला जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एखाद्या मोठ्या कलाकाराच्या आयुष्यावर बातमी देताना त्यांच्या कामाचा आढावा घेणे ही पत्रकारितेची परंपरा आहे. तसेच आशा भोसले या नूर जहाँ यांना आपली मोठी बहीण मानत असत आणि त्यांनी नुसरत फतेह अली खान यांच्यासोबतही काम केले आहे. सोबत युद्ध आणि संघर्षाच्या काळात कला आणि कलाकार बळी पडू नयेत. संगीत आणि कलाच लोकांना जवळ आणतात,” असं अब्बास यांनी म्हटलं आहे.












