Prasad Lad On Maratha Reservation | आज प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भेट घेतली. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणांसदर्भातील काही मागण्या मान्य न झाल्यामुळे मनोज जरांगेंनी आक्रमक होत 30 मे रोजी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेत त्यांना उपोषण न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार असल्यांचंही लाड यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा – मातोश्रीवर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, पक्षफुटीला रोख बसणार?
मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या पूर्ण होणार? नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड?
मराठा आरक्षणासंदर्भात प्रसाद लाड म्हणाले की, मी आज येथे वैयक्तिक मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंनी संपूर्ण मराठा समाजाला स्वाभिमान मिळवून दिला आहे. तसेच आताही मराठा समाजाचं काम पूर्ण होईल. मी आज मराठा समाजासाठी इतक्या लांब आलो आहे. मी जरांगेंच्या आमंत्रणावरून इथे आलो आहे. पण या दरम्यान मला काही जणांनी फोन करत धमक्या दिल्या, शिव्या दिला. मी समाजासाठी मरायला देखील तयार आहे. मी जातीसाठी माती खायलाही तयार आहे. मी येथे भगवत गीतेतील सार घेऊन आलो आहे, असं लाड म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मला मराठा समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी मी मनोज जरांगेंच्या 7-8 मागण्या आहेत त्या समजून घेणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की मराठा समाजाच्या या मागण्यांवर काहीतरी तोडगा निघेल. या मागण्या मी सरकार आणि उपसमितीला सांगून त्यांच्याशी यावर चर्चा करेन. आत्तापर्यंत या मागण्या पूर्ण का नाही झाल्या हे समजून घेऊन. काही गोष्टींमध्ये कायदेशीर अडचणी असतात. मात्र, मला थोडा वेळ दिला तर मी या मागण्या पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेनं. तसेच जर या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मी शब्द दिल्याप्रमाणे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. मी मराठा समाजासाठी राजीनामा देईन, असं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलं आहे.
मी मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. आपल्या देशात सात कोटींपेक्षा अधिक मराठा समजा असून आपल्या देशावर मराठा समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांनी दिलेले संस्कार आहेत. त्यामुळे मी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. पण मनोज जरांगेंनी 30 मे रोजी आमरण उपोषण करू नये, असं आवाहन प्रसाद लाड यांनी केलं. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उपोषणामुळे आधीच त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांनी आमरण उपोषण करू नये. आता हत्ती गेला आहे फक्त शेपूट राहिले आहे, असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.












