Shivsena UBT Meeting | आज (22 मे) मराठवाड्यातील (Marathwada) पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर (Matoshree) एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर या बैठकीत विधान परिषद निवडणूकीच्या (Legislative Council Elections) पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – “मी उद्या सकाळी फाशी घेतो, नाही घेतली तर…”, मनोज जरांगेंनी दिलं खुलं चॅलेंज, थेट सरकारवर साधला निशाणा
मातोश्रीवर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठका का आयोजित करण्यात आली? नेमकं कारण काय?
मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची होणारी आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक मराठवाड्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक पार पडणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या एका खास स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे गटाच्या दोन प्रमुख खासदारांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यामध्ये हिंगोलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख हे या डिनरला उपस्थित होते. आगामी निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ असं नाव देत गुप्त रणनीती आखली होती. शिंदेंच्या या ऑपरेशन टायगरचं मुख्य उदिष्ट संख्याबळ वाढवणे हे आहे. तर सध्या शिंदे गटाचे 7 खासदार आहेत आणि जर ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले तर ही संख्या 19 पर्यंत नेण्याचे त्यांचे टार्गेट आहे. त्यासाठी ठाकरे गटातील खासदारांना आपल्या पक्षात वळवण्याची रणनीती शिंदे गट आखत असल्याची माहिती समोर येत आहे.
पक्षफुटीला रोख बसणार का?
काही दिवसांपूर्वी खासदार संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. तसेच परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोबतच दिल्लीतील डिनर डिप्लोमसीमुळे उद्धव ठाकरे यांच्या समोर आपल्या खासदारांना एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यापार्श्वभूमीवर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसोबतची आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
उद्धव ठाकरेंनी आजची ही महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे ज्यामध्ये मराठवाड्यातील सर्व नेते, पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. सध्या विधान परिषदेच्या निवडणूका या तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणूकीमध्ये नेमकी रणनीती काय असणार? आपण महाविकास आघाडीसोबत जायचं की स्वबळावर ही निवडणूक लढवायची याबाबत उद्धव ठाकरे आज बैठकीत चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच उद्धव ठाकरे हे आगामी निवडुणकांच्या दृष्टीने मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मराठवाड्यातील राजकीय परिस्थिती, संभाव्य उमेदवार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षांची ताकद यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मातोश्रीवर होणारी ही बैठक आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण मराठवाडा हा राजकीयदृष्ट्या निर्णायक प्रदेश मानला जातो. मराठवाडा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा राजकीय भाग असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












