Suvendu Adhikari: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली आहे. पाहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत त्यांनी सुरक्षा, आरोग्य आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे राज्याच्या धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीमासुरक्षेला प्राधान्य
मंत्रिमंडळ बैठकीत भारत- बांगलादेश सीमावर्ती भागातील सुरक्षेला विशेष महत्व देण्यात आले. सीमा कुंपणासाठी आवश्यक जमीन बीएसएफकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागांना ही प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयुष्मान भारत योजना लागू होणार
राज्यात आयुष्मान भारत योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांना आरोग्यसेवेचा अधिक लाभ मिळावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे काम करणार असल्याचे सांगण्यात आले.
नवीन फौजदारी कायद्यांना मंजुरी
भारतीय न्याय संहितेसह नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षणाची संधी
राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास परवानगी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा
राजकीय हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
टीएमसी सरकारवर निशाणा
बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मागील सरकारवर टीका केली. काही महत्त्वाच्या योजना आणि कायद्यांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक रखडवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.










