Rohit Pawar | सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी रोहित पवार भाजपमध्ये सामील होण्यास इच्छुक असल्याचं मोठं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उ़डाली आहे. तर भाजपमध्ये जाण्याच्या या चर्चांवर रोहित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा – धाडीदरम्यान सापडला अफाट पैसा, उद्योगपतींनाही टाकलं मागं; बिहारच्या अभियंत्याच्या मोठा कारनामा उघड
काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली 22 आमदार भाजपमध्ये सामील होतील, असा दावा केला होता. तसेच शिवसेनेचे काही आमदारही भाजपमध्ये सामील होण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. हे आमदार पक्ष बदलण्यास तयार आहेत पण अडचण अशी आहे की, जर त्यांनी आता असे केले तर त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे ते 2029 च्या राज्य निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये सामील होतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर सुनील तटकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधत ते भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं.
रोहित पवार भाजपमध्ये जाणार?
सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांचा दावा फेटाळत म्हटलं की, रोहित पवारांचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत. खरंतर रोहित पवार स्वतः भाजपमध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेप्रती असलेल्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. आम्ही एनडीएचा भाग आहोत आणि आमचा पक्ष व त्याचा पाठिंबा मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तर सुनील तटकरेंनी केलेल्या या दाव्यावर आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार म्हणाले की, जर मला भाजपमध्ये जायचं असतं तर मी ते खूप पूर्वीच केलं असतं. मी एवढे प्रयत्न आणि संघर्ष का करू? जर आपण या अफवांमध्येच अडकत राहिलो तर लोकांचा विचार कोण करणार? असं प्रत्युत्तर देत रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आजच्या खऱ्या समस्यांचा विचार केला तर त्या खूप वेगळ्या आहेत. महागाई प्रचंड वाढली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. या सर्व मुद्द्यांवर आज चर्चा व्हायला हवी. तसेच महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. संसदेत घटनात्मक बदलांची गरज आहे आणि जर आपण ते केले तर सत्ताधारी सरकारशी बोलून हा प्रश्न सोडवता येईल, असंही रोहित पवार म्हणाले.












