PM Modi five-country tour : भारताचे पंतप्रधान पाच देशांचा दौरा पूर्ण करून आज पहाटे पहाटे भारतात परतले. संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या राजनैतिक दौऱ्यांनंतर पंतप्रधान मोदी नवी दिल्लीत परतले. हे दौरे जेवढे चर्चेत राहिले तेवढेच भारतासाठी महत्वाचे पण मानले जातात. परदेश प्रवास टाळा असा सल्ला भारताच्या जनतेला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र ५ देशांचा दौरा केला, पंतप्रधानांच्या या दौऱ्यातून भारताला नेमकं काय मिळालं ? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे रोजी जनतेला आवाहन केलं सोनं खरेदी करू नका, पेट्रोल जपून वापरा, मेट्रो, बस ने प्रवास करा, तेल जपून वापरा. याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे परदेश प्रवास करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मात्र अवघ्या ५ दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौर्यावर निघाले. यावरून अनेक राजकीय टीका देखील झाल्या. विरोधकांनी या परदेश दौऱ्यावर मोदींचे वाभाडे काढले, मात्र पाच देशांच्या दौऱ्यात भारताला काही ना काही नक्की मिळालं असणार. पंतप्रधान मोदींनी 15 मे 2026 रोजी UAE ला भेट दिली. यावेळी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी अबुधाबीमध्ये त्यांचे जोरदार स्वागत केले. या काळात दोन्ही देशांनी संरक्षण संबंधांना नव्या उंचीवर नेले.
हेही वाचा – रेल्वे भरतीला आलेल्या भैय्यांना चोपलं, राज ठाकरे निर्दोष मुक्त झाले
दीर्घकालीन द्रवीकृत पेट्रोलियम वायू पुरवठा सुनिश्चित झाला
या दौऱ्यातून भारताला दीर्घकालीन द्रवीकृत पेट्रोलियम वायू पुरवठा सुनिश्चित झाला असून, पेट्रोलियम साठ्यासाठी संयुक्त सहमती झाली आहे. भारताच्या रस्ते, बंदरे, ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्राच्या विकासासाठी ५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि व्यापाराला गती देण्यासाठी दोन्ही देशांनी आपापल्या चलनात व्यापार करण्याची सहमती दर्शवली आहे. भारताच्या ऊर्जा आयातीला सोप्पं करण्यासाठी आणि नौकानयनाला चालना देण्याकरिता गुजरातच्या वाडीनार भागात शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याचा निर्णय झाला आहे. या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत.
हाय-टेक तंत्रज्ञान आणि व्यापाराशी संबंधित १७ महत्त्वाच्या करार
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी १६ आणि १७ मे ला नेदरलँड देशाचा दौरा केला. याठिकाणी दोन्ही देशांमध्ये संरक्षण, हाय-टेक तंत्रज्ञान आणि व्यापाराशी संबंधित १७ महत्त्वाच्या करार झाले . डच कंपन्यांच्या मदतीमुळे भारताला चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनात जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळणार आहे. नेदरलँडने चोल साम्राज्यातील १००० वर्षे जुन्या दुर्मिळ तांब्याच्या पट्टिका भारताला सन्मानाने परत केल्या. पूर नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि हरित हायड्रोजन क्षेत्रात भारत-नेदरलँड एकत्र काम करणार आहेत. या दौऱ्यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची नवीन परदेशी गुंतवणूक येईल आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळतील.
आर्थिक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे
पंततप्रधान मोदी यांनी १७ आणि १८ मे रोजी स्वीडनचा दोन दिवसांचा दौरा केला. त्यांच्या स्वीडन भेटीचे अनेक महत्त्वाचे परिणाम मिळाले. भारताला आर्थिक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे फायदे मिळाले आहेत. दोन्ही देशांचे संबंध आता थेट ‘पूर्ण धोरणात्मक भागीदारी’ या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. पीएम मोदींच्या स्वीडन दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक दुप्पट होणार आहे. भारताला सेमीकंडक्टर आणि ६जी साठी एआयआणि तंत्रज्ञान कॉरिडॉर ची मदत मिळेल. स्वीडनच्या आधुनिक कंपन्या भारतात गुंतवणूक करून नवीन रोजगार निर्माण करतील. पर्यावरणपूरक हरित ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळणार आहे.
आगामी १५ वर्षांत भारतात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
सर्वात वादात राहिलेला पंतप्रधान मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यातून काय मिळाले तर. १८ आणि १९ तारखेला मोदी नॉर्वे दौऱ्यावर होते. दोन्ही देशांमधील संबंध आता ग्रीन स्ट्रेटेजिक पार्टनरशिप या सर्वोच्च स्तरावर पोहोचले असून स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाला गती मिळेल. ऐतिहासिक भारत- इफ्टा करारांतर्गत आगामी १५ वर्षांत भारतात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि १० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य निश्चित झाले आहे. भारत आणि नॉर्वेमध्ये डिजिटल डेव्हलपमेंट पार्टनरशिप सुरू झाली असून, ६जी, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि अंतराळ क्षेत्रात मोठे सहकार्य लाभेल. सागरी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासोबतच, भारतातील रस्ते, हायवे बांधकामासाठी नॉर्वे आपले जागतिक दर्जाचे जिओटेक्निकल तंत्रज्ञान पुरवणार आहे. दोन्ही देशांनी मिळून एक त्रिकोणीय विकास सहकार्य करार केला आहे.
द्विपक्षीय व्यापार २० अब्ज युरोवर नेण्याचा आणि गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय
सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मोदी यांचा पाचव्या देशाचा दौरा ठरला तो इटली दौरा. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जोरदार स्वागत पंतप्रधानाचे केले आणि फोटोही पोस्ट केले. आणि मोदीजींनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट म्हणून दिलं. पण या भेटीत दोन्ही देशांनाही गिफ्ट मिळालं आहे. भारत आणि इटलीने त्यांच्या संबंधांना सर्वोच्च अशा ‘विशेष धोरणात्मक भागीदारीत बदलले आहे. दोन्ही देशांनी २०२९ पर्यंत आपला द्विपक्षीय व्यापार २० अब्ज युरोवर नेण्याचा आणि गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इटलीमध्ये भारतीय परिचारिकांची भरती सुलभ करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी विशेष मोबिलिटी करार करण्यात आला आहे. संरक्षण, अंतराळ, सेमीकंडक्टर, एआय आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर वेगाने पुढे नेण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.
पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पहाटेच भारतात परतले आहेत, पंतप्रधान मोदीजींनी जसे मेलोनी यांना गिफ्ट दिलं तसं या पाच देशांच्या दौऱ्यातूनही भारताला हे गिफ्ट आणलं आहे. काहीही असो पण यामुळे भारत इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत असून भारताच्या विकासासाठी हे दौरे सध्यातरी चांगले ठरले आहेत, असे म्हणावे लागले.












