Vande Mataram 150 Years Debate : ‘वंदे मातरम’ला 150 वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत विशेष चर्चासत्राला सुरुवात करणार आहेत. वंदे मातरम या देशभक्तीपर गीताबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टीवर ते बोलणार आहेत. यापूर्वी काँग्रेसनं गीतामधील महत्त्वाच्या ओळी काढून टाकल्याचा सरकारवर आरोप केला होता. त्यावर पंतप्रधान मोदी काय बोलणार, याकडं विरोधी पक्षांचं लक्ष असणार आहे.
काय म्हणाले होते मोदी :
यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेसच्या निर्णयामुळे भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली. राष्ट्रगीताचे तुकडे झाले. त्यावर रवींद्रनाथ टागोरांच्या सल्ल्यावर आधारित निर्णय घेतल्याचं काँग्रेसनं स्पष्टीकरण केलं होतं. राज्यसभेत मंगळवारी वंदे मातरमवरील चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुरुवात करणार आहेत. वंदे मातरम चर्चेशी संबंधित वेळापत्रकानुसार लोकसभेत एकूण 10 तासांचा वेळ देण्यात आला आहे. त्यापैकी सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना तीन तास देण्यात आले आहेत.
‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’ शब्द न वापरण्याच्या सूचना :
तत्पूर्वी, हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच राज्यसभा सचिवालयानं संसदेत शिष्टाचार राखण्यासाठी खासदारांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’ सारखे शब्द वापरणं टाळावं, असा सूचना दिल्या होत्या. त्यावर भारताचं स्वातंत्र्य आणि एकतेच्या प्रतिकांबद्दल एनडीए अस्वस्थ असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. वंदे मातरमबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद असल्यानं संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
हे ही वाचा : राजकीय पट! राज्याच्या राजकारणातल्या सध्या ‘या’ आहेत महत्त्वाच्या ३ घडामोडी
भाजपाची काँग्रेसवर जोरदार टीका :
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी रविवारी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. जवाहरलाल नेहरूंचा ‘निर्मित वारसा’ जपण्यासाठी काँग्रेसकडून निवडकपणे इतिहास जपत आण्यात आल्याचा पात्रा यांनी आरोप केला. काँग्रेस नेते नियमितपणे भाजापवर नेहरूंचे योगदान पुसून टाकल्याचा आरोप करतात. त्यावर भाजपाचे प्रवक्ते यांनी काँग्रेसकडून अनेक राष्ट्रीय आदर्शांना कमी लेखण्यात आल्याचा आरोप केला. नेहरु केंद्रित गोष्टी ठसविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही दशके बाजूला करण्यात आलं होता, आरोप पात्रा यांनी केला.












