The temperature has risen : अकोल्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. राज्यात तापमानाचा पारा चढत असून नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता लवकर जाणवू लागली असून पश्चिम विदर्भात सर्वाधिक तापमान नोंदवले जात आहे. विदर्भातील जवळपास ११ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचला आहे. तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे.
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढताना दिसत असून आता ते तब्बल ४०.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे.
वाढत्या उन्हामुळे थंड पेयांच्या दुकानांना मोठी मागणी
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये मातीचे माठ, रांजण, कुलर, एसी तसेच थंड पेयांच्या दुकानांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिक लिंबूपाणी, ताक, थंड पेय यांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांना मोठा त्रास
दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांचा सल्ला
– दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे शक्यतो टाळावे.
– बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा.
– शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक.
– लिंबूपाणी, ताक, नारळपाणी आणि फळांचे रस यांचे सेवन करावे.
– हलके आणि सुती कपडे वापरावेत.
– जास्त वेळ उन्हात काम करणे टाळावे, मध्ये मध्ये सावलीत विश्रांती घ्यावी.
– चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी किंवा ताप अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
येत्या दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा चढत असल्याने येत्या दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेत स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.












