Vadinar Port | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये या युद्धाचा परिणाम भारतावरही (India) झाल्याचं दिसून येत आहे. आक्रमक इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा (Hormuz Strait) मार्ग बंद केल्यामुळे गॅस, तेलाचे टँकर असलेले अनेक जहाज अडकून पडले आहेत. त्यामुळे बाकी देशांसोबत भारतात गॅस आणि तेलाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसत आहे. अशातच आता भारताला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
हेही वाचा – औषधांचं अतिसेवन, अर्धांगवायूचा झटका तरीही वासना सुटली नाही; खरातबाबत धक्कादायक खुलासा
‘जग वसंत’ जहाज वडीनार बंदरामध्ये दाखल
वडीनार बंदरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘जग वसंत’ नावाचे एलपीजी गॅसने भरलेले एक जहाज वडीनार बंदरामध्ये दाखल झाले आहे. या जहाजामध्ये अंदाजे 16,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस असून देशांतर्गत गॅस पुरवठा करण्यासाठी हा साठा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावादरम्यान भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे.
भारतातील एलपीजी गॅसची समस्या संपणार?
‘जग वसंत’ हे जहाज वडीनार बंदरात आल्यानंतर बंदर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून तेथील कामकाज अधिक कडक करण्यात आले आहे. तर आता जग वसंत हे जहाज मोठे असून या जहाजातून ‘रोझ’ नावाच्या लहान टगमध्ये एलपीजी हस्तांतरित केला जाणार आहे. तर जग वसंत भारतात सुरक्षितरित्या दाखल झाल्यामुळे देशातील गॅस पुरवठा आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनेक देशांच्या जहाजांच्या वाहतुकीवर बंदी घातली होती. तर आता इराणने आपल्या पाच मित्र देशांची यादी जाहीर करत या देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. या यादीमध्ये भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या देशांची नावे आहेत. विशेष म्हणजे इराणने जाहीर केलेल्या या यादीत भारताचे नाव अग्रस्थानी होते. तर आता इराणने या सर्व देशांच्या जहाजांना व्यापारी वाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक कच्च्या तेलाचा आणि वायूचा सुमारे 20 टक्के पुरवठा केला जातो, जो 20 ते 25 दशलक्ष बॅरल इतका असतो. तर भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. कारण भारत आपल्या एकूण तेलाच्या वाहतूकींपैकी सुमारे 12 ते 15 टक्के वाहतूक या सामुद्रधुनीतून करतो.












