Nagpur Crime | नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. “वेळ काढून माझ्या अंत्ययात्रेला या…”, अशा शब्दांता भावनिक चिठ्ठी लिहून नागपूरमधील मयुरी मेंढे या विवाहितेने आत्महत्या (Suicide) करत आपले जीवन संपवले आहे. या घटनेनं संपूर्ण नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – SIT तपासात मोठा खुलासा; भोंदू खरात प्रकरणात नाशिकच्या बड्या महिला अधिकाऱ्याचं कनेक्शन?
मयुरीने टोकाचे पाऊल का उचलले?
समोर आलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून मयुरी मेंढे आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत होते. दररोजच्या या वादामुळे मयुरी मानसिक तणावात होती. तर रोज होण्याऱ्या कौटुंबिक कलहामुळे मयुरी महिनाभरापूर्वीच आपल्या माहेरी महादुला येथे निघून गेली होती. अशातच नैराश्यातून मयुरीने आता टोकाते पाऊल उचलले आहे.
घरातील सदस्य कामासाठी बाहेर गेल्यानंतर मयुरीने घरात गळफास लावत आपले जीवन संपवले आहे. जेव्हा रात्रीच्या वेळी तिचे कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला असता त्यांना मयुरी मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीनं रूग्णालयात दाखल केलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. यावेळी पोलिसांना तपासादरम्यान एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये मयुरीने पतीवर असलेले प्रेम व्यक्त करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मयुरीने आपल्या पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिच्या पतीने फोन उचलला नाही. पतीकडून प्रतिसाद न मिळाल्याने हताश झालेल्या मयुरीने शेवटी टोकाचे पाऊल उचलले.
चिठ्ठीत मयुरीने नेमकं काय लिहिलं आहे?
मयुरीने चिठ्ठीत लिहिले आहे की, संदीप मी तुमच्यावर खूप प्रेम करते. दीड महिन्यापासून मी तुम्हाला खूप समजावत होते, पण तुम्ही मला समजून घेतलं नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मी आता तुम्हाला सांगून थकले आहे त्यामुळे मी तुमच्यापासून खूप दूर जात आहे. याला जिम्मेदार तुम्ही आहात. तुम्हाला वेळ मिळत नाही ना. आता तुम्हाला सुट्टी घ्यायची गरज पडणार नाही. उद्या रविवार सुट्टी आहे माझ्या अंत्ययात्रेला या. तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे. तुम्ही दिलेली साडी नेसली आहे. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा तशीच मी तयार झाली आहे. त्यामुळे वेळ काढून नक्की या. तुम्ही मला मजबूर केलं आहे त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असं मयुरीने चिठ्ठीत लिहिलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी ही चिठ्टी जप्त केली असून ते पुढील तपास करत आहेत. तर या घटनेनंतर संपूर्ण नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.












