Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक करत त्यांना लुबाडलं आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला अटक केली आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे अनेक काळे कारनामे समोर येताना दिसत आहेत. यामध्ये अशोक खरातचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशातच आता भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे.
हेही वाचा – अजित पवारांना न्याय मिळणार? ‘जस्टिस फॉर दादा’ म्हणत अमोल मिटकरींची मोठी घोषणा
अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
अशोक खरात प्रकरणावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं असून मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण समोर येण्यापूर्वी अशोक खरात विरोधात खूप तक्रारी येत होत्या. मात्र, तेव्हा त्याच्यावर कारवाई केली जात नव्हती. नाशिक पोलिसांच्या नाकाखाली कारभार केला जात होता. मग तेव्हा खरातवर कारवाई का करण्यात आली नव्हती? असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला.
राजकीय कनेक्शनबाबत राधाकृष्ण विखे पाटलांनी काय केला दावा?
खरातवर एवढा मोठा राजकीय आश्रय होता की त्याच्यावर कारवाई करण्याचं कोणाचंही धाडस होत नव्हतं, असा खळबळजनक दावा विखे पाटलांनी केला आहे. ते म्हणाले की, खरातचे एवढे पुरस्कर्ते होते की त्यामुळे त्याला मोठा राजकीय आश्रय मिळत होता. या राजकीय आश्रयाने खरातवर कोणीही कारवाई करण्याचं धाडस करत नव्हतं. तेव्हा गुप्तचर यंत्रणा, SID, स्थानिक गुन्हे शाखा काय करत होत्या? जर मी शिर्डीत गुन्हा दाखल केला नसता तर पुढे कितीतरी दिवस हे असंच चाललं असतं. इतर अधिकाऱ्यांकडे आणि राजकीय पुढाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा खरी जबाबदारी कोणाची होती? हे पाहणं महत्त्वाचं आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून एकच खळबळ उडाली आहे. खरात प्रकरणात सध्या महिला आयोगच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या अडचणीत सापडल्या असून त्यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही राजकीय नेत्यांची नावे देखील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












