Nida Khan police custody : आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या एमआयएम च्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या समर्थनार्थ मोठं विधान केलं आहे. ओवैसी म्हणाले की, “निदा खान टीसीएसच्या एचआर विभागात काम करत नव्हती. तसेच एफआयआर दाखल होण्यापूर्वीच तिची बदली झाली होती. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येत नाही. आरोप करणाऱ्यांनी आपले आरोप न्यायालयात सिद्ध करावेत.”
निदा खानची पाठराखन
यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय द्वेष असल्याचा आरोपही केला. “निदा खानविरोधातील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसत आहे. इन्शाल्लाह तिला न्याय मिळेल आणि तिच्यावरील आरोप सिद्ध होणार नाहीत,” असेही ओवैसी यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांवरही निशाणा साधला. “सध्या काही लोकांकडून मीडिया ट्रायल सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच एखाद्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे ते म्हणाले. तसेच टीसीएसमधील तक्रारदार व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, टीसीएस प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानली जाणारी निदा खान तब्बल ४२ दिवस फरार होती. अखेर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला अटक करण्यात आली. नंतर तिला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू आहे.
वंदे मातरम्’ हे गीत दुर्गा मातेच्या स्तुतीशी संबंधित
‘वंदे मातरम्’ हे गीत दुर्गा मातेच्या स्तुतीशी संबंधित असल्याचे विधान असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या पत्राचाही उल्लेख केला. ओवैसी म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या पत्रामध्ये ‘वंदे मातरम्’मधील काही कडव्यांमध्ये देवी दुर्गेचे वर्णन असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे वंदे मातरम ह्याला विरोध असल्याची भूमिका त्यांचिं परत एकदा अधोरेखित झाली आहे. यासोबतच ओवैसी यांनी संविधान, वैयक्तिक श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत, कोणत्याही व्यक्तीवर एखादे घोषवाक्य किंवा गीत जबरदस्तीने लादता येणार नाही, असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, सोशल मीडियावरही या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.”
नाशिक टीसीएस प्रकरणामुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, आगामी काळात हे प्रकरण आणखी गाजण्याची शक्यता आहे.












