Bhor Crime News : पुणे जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्मण करणारी घटना घडली. एका व्यक्तीने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, मुलीने प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेतली. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील ज्या भोर तालुक्यात साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचे 65 वर्षांच्या नराधमाने लचके तोडले. त्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा भोरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या मुलीला फसवून एका 36 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखत आरोपीच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: महागड्या ब्रँड्सची गरज नाही! कमी बजेटमध्ये मिळवा लक्झरी लुक, आजचं फॉलो करा या 5 टिप्स
नेमकी घटना काय?
माहितीनुसार, भोर तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. याचवेळी आरोपीने तिचा रास्ता अडवत, ” तुझे वडील घरात आहेत, त्यांनी तुला बोलवले आहे,” असे सांगून तिची दिशाभूल केली. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्या घरात प्रवेश केला.
घरात गेल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच मुलीने धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत पाणी पिण्याचा बहाणा केला. ती स्वयंपाकघरात गेल्यानंतर मागील दरवाजातून बाहेर पडली आणि तेथून पळ काढला.
ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात
मुलगी घराबाहेर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तिची अवस्था पाहून तातडीने मदत केली. तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
आरोपीविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा
घटनेनंतर भोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध POCSO कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवत अवघ्या 36 तासांत सातारा जिल्ह्यातून त्याला अटक केली.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भोरमधील या घटनेमुळे राज्यातील महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी POCSO कायदा, कठोर शिक्षेची तरतूद आणि फास्ट ट्रॅक न्यायालये अस्तित्वात असतानाही अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे केवळ कायदे बनवणे पुरेसे नसून त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जलद न्यायप्रक्रिया आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना, शाळा-कॉलेज परिसरात सुरक्षा वाढवणे, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे तसेच महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारल्याशिवाय अशा घटनांना आळा घालणे कठीण असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.









