Bhiwandi Building Collapse: शहरातील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही तळमजला आणि चार मजल्यांची इमारत गुरुवारी उशिरा रात्री अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, पाच ते सहा जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल आणि महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे बचाव पथकांना दुर्घटनास्थळी पोहोचण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. त्यानंतर बचाव पथकांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचून शोधमोहीम सुरू करता आली.
कोहिनूर अपार्टमेंटची उभारणी
माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंटची उभारणी २०१२ मध्ये झाली होती. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित होत होते. त्यामुळे महानगरपालिकेने काही काळापूर्वीच ही इमारत धोकादायक घोषित करून रहिवाशांना नोटिसाही बजावल्या होत्या.
दरम्यान, इमारतीच्या एका विंगमधील तळमजल्यावरील काही खांब कमकुवत झाल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी सायंकाळपासूनच इमारतीला तडे जाऊ लागले होते. रात्रीच्या सुमारास इमारत एका बाजूला झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र काही जण आपले सामान घेण्यासाठी पुन्हा इमारतीत गेले होते, तर तळमजल्यावर दुरुस्तीचे कामही सुरूच होते. त्याचवेळी इमारत अचानक कोसळली.
या घटनेबाबत आमदार महेश चौघुले यांनी सांगितले की, संबंधित इमारत धोकादायक असल्याची नोटीस आधीच देण्यात आली होती. सध्या विविध बचाव पथके घटनास्थळी कार्यरत असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महापौर नारायण चौधरी यांनी सांगितले की, अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था जवळील समाजमंदिर आणि शाळांमध्ये करण्यात आली आहे. तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांनी सांगितले की, इमारतीतील खांबांच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांत संपूर्ण इमारत कोसळली. अरविंद गुप्ता आणि त्यांच्या पत्नीने वेळेत बाहेर पडून जीव वाचवला, तर त्यांची मुलगी कोमल काही काळ ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिने स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेर पडत जीव वाचवला.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनीही तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने शोध आणि बचावकार्य सुरू आहे.









