Jalgaon Crime : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला आणि या चित्रपटाने महाराष्ट्रसह देशभराला वेड लावलं..या चित्रपटात एका उच्चभ्रू घरातील मुलगी आणि सामान्य, गरीब घरातील मुलाची प्रेमकहानी दाखवण्यात आली आहे..परश्या जेव्हा आर्चीसोबत लग्न करतो आणि त्यांना एक मुलगा झाल्यानंतरही आर्चीच्या घरचे परश्याला आणि आर्चीला शोधून त्यांची हत्या करतात, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे…हे दृष्य पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते…हा चित्रपट केवळ काल्पनिक होता..मात्र या चित्रपटात जशी घटना दाखवली आहे, तशीच घटना आता जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे…फत्तेपूर परिसरात बहिणीने दुसऱ्या जातीतील एका मुलासोबत प्रेमविवाह केल्याने भावाने थेट बहिणीच्या पतीला संपवलं आहे…आरोपीने आधी मेहुण्याला जंगलात नेऊन हल्ला केला…पाहूयात की जळगावमध्ये नेमकं काय घडलंय? बहिणीने प्रेमविवाह केल्याने भावाने मेहुण्याची हत्या का केली आहे? समाजातील ही कीड कधी संपेल?
जळगावमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना नेमकी काय आहे? ( Jalgaon Crime )
जळगावमधील फत्तेपूर येथील सुभाषपुरा भागात राहणारा 26 वर्षीय प्रशांत चौधरीचे वडगाव सद्दो येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.. मात्र, दोघांच्याही जाती वेगवेगळ्या असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांचा, विशेषतः तिचा १९ वर्षीय भाऊ अभिषेक मोरेचा या नात्याला तीव्र विरोध होता… कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध झुगारून प्रशांत आणि त्या तरुणीने काही महिन्यांपूर्वी कायदेशीररीत्या आंतरजातीय प्रेमविवाह ( Inter Caste Marriage ) केला आणि ते एकत्र संसार करू लागले… आपली सख्खी बहीण दुसऱ्या जातीच्या मुलासोबत निघून गेल्यामुळे आणि तिने प्रेमविवाह केल्यामुळे कुटुंबाची समाजात मोठी बदनामी झाली, अशी सूडाची भावना अभिषेकच्या मनात निर्माण झाली होती.. या विवाहाचा राग मनात ठेवून तो प्रशांतचा काटा काढण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होता, अशी माहिती आहे…
हेही वाचा : गॅस सिलेंडरमध्ये 4 लिटर पाणी? लातूरमधील धक्कादायक प्रकार ,
प्रशांत चौधरीची हत्या कशी करण्यात आली? ( Inter Caste Marriage )
27 जुलै रोजी सायंकाळी 19 वर्षीय आरोपी अभिषेक मोरेने अत्यंत चलाखीने प्रशांत चौधरीला विश्वासात घेतले… त्याने जुना राग विसरल्याचे भासवून गोड बोलून प्रशांतला त्याच्याच दुचाकीवर बसवले आणि तोरणाळा शिवारातील जंगल परिसरात नेले… जंगलात गेल्यानंतर दोघांनी मिळून एकत्र मद्यपान केले… मात्र काही वेळातच त्यांच्यात पुन्हा विवाहाच्या कारणावरून जोरदार वाद सुरू झाला… वाद विकोपाला गेल्यानंतर अभिषेकने एक मोठा दगड उचलून थेट प्रशांतच्या डोक्यात घातला… हा हल्ला इतका भीषण होता की प्रशांत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.. प्रशांतचा जाग्यावरच मृत्यू झालाय असा गैरसमज, अभिषेकला झाला… अभिषेकने गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी प्रशांतचा अर्धमेलेला देह जंगलातील एका खड्ड्यात फेकून दिला.. त्यानंतर त्याच्या शरीरावर झाडाच्या फांद्या आणि पालापाचोळा टाकून तो प्रशांतचीच दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला…
इकडे प्रशांत रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध सुरू केला.. परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही… अखेर प्रशांतची आई सरला चौधरी यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली… पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत शोधमोहीम सुरू केली आणि तोरणाळा जंगल परिसरातून प्रशांतला अत्यंत गंभीर अवस्थेत शोधून काढले… त्याच्या डोक्याला, मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला प्रथमतः जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले… मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.. तिथे डॉक्टरांच्या पथकाने त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.., परंतु अंतर्गत रक्तस्रावामुळे अखेर शुक्रवारी उपचारादरम्यान प्रशांतची प्राणज्योत मालवली..
खुनाच्या प्रयत्नापासून थेट खुनाचा गुन्हा कसा दाखल झाला? ( Love Marriage )
गुन्हा घडल्याचे समजताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला सिल्लोड जवळील अन्वी परिसरातून ताब्यात घेतले… पोलिसांनी सुरुवातीला आरोपी अभिषेक मोरेविरुद्ध ‘खुनाच्या प्रयत्नाचा’ गुन्हा दाखल केला होता… परंतु, आता उपचारादरम्यान जखमी प्रशांतचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात थेट ‘खुनाचे’ वाढीव कडक कलम समाविष्ट केले आहे… या दुर्दैवी ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रचंड हळहळ आणि संतापाची लाट पसरली असून, या हत्येच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत…
पण प्रश्न असा निर्माण झालाय की पुरोगामी, सुसंस्कृत महाराष्ट्रातून ही जाती वादाची कीड कधी नष्ट होईल…देशात कोणत्याही राज्यात वारी सारखी संस्कृती नाही, पण ती महाराष्ट्रात आहे…वारीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सहभागी होतात..वारीतून जात, पात, उच्च-नीच असा कोणताही भेद न मानता सर्वजण एक आहे, असा संदेश दिला जातो…वारीत सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होत विठुरायच्या नामाचा जयघोष करतात…असं असलं तरी आज 2026 मध्येही केवळ बहिणीने दुसऱ्या जातीमधील तरूणाशी लग्न केल्याने 19 वर्षीय तरूण थेट मेहुण्याची हत्या करताना दिसत आहे..या तरुणाचं आयुष्य आता सुरु झालं होतं…पण त्याने थेट हत्येसारखा गंभीर गुन्हा केला असून आता तो उर्वरित आयुष्य जेलमध्ये काढण्याची शक्यता आहे…म्हणजे सध्याच्या तरूणांची मानसिकता किती गंभीर होत चालली आहे, हे समजते…महाराष्ट्रातून आणि देशातून ही जात-धर्माची कीड कधी दूर होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे…या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा…
FAQ
1. जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना कुठे घडली?
जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर परिसरात ही घटना घडल्याचा आरोप आहे.
2. हत्या का करण्यात आल्याचा आरोप आहे?
बहिणीने दुसऱ्या जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे.
3. मृत व्यक्तीचे नाव काय आहे?
या प्रकरणात प्रशांत चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
4. आरोपीला अटक झाली आहे का?
होय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.
5. या प्रकरणात कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे?
प्रशांत चौधरी यांच्या मृत्यूनंतर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









