Pimpri Pillai Family Suicide : आम्ही आमचे जीवन स्वतःच्या इच्छेने संपवत आहोत. या निर्णयाला कोणीही जबाबदार नाही… मोबाईलच्या स्क्रीनवर टाईप केलेली ही सुसाईड नोट आणि खोलीच्या कोपऱ्यात एका घमेल्यात धगधगणाऱ्या कोळशावर पडलेले पांढरे रसायन… एका उच्चशिक्षित, समाजात मान सन्मान असलेल्या पिल्ले कुटुंबाच्या घरात असकाही घडलं कि पाहिल्यानंतर तिथल्या लोकांचा थरकाप उडाला….
पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी भागातील करिष्मा ग्लोरी सोसायटीच्या रूम नंबर २०१ मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला… आयआयएम पदवीधर पती, नामांकित शाळेत मोठ्या पदावर असणारी पत्नी आणि कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणारी मुलगी… या तिघांनी मिळून मृत्यूचा जो मार्ग निवडला, त्याने पोलिसांनाही चक्रावून सोडलं. हे प्लॅन्ड सुसाईड नेमकं घडलं कसं? कोळशावर नेमकं कोणत रसायन टाकण्यात आलं होतं ? दोन महिन्यांपासून या मृत्यूची कशी तयारी सुरू होती? आणि एका सुखी कुटुंबाला या टोकाच्या पाऊलापर्यंत कोणी ढकललं?
पिंपरीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीत नेमकं काय घडलं? ( Pimpri Pillai Family Suicide )
पिंपरीच्या मोरवाडी परिसरातील करिष्मा ग्लोरी सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर विनोद पिल्लई हे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. विनोद यांच्या पत्नी सिरजा पिल्लई या मोरवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत को-ऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होत्या. शनिवारी सकाळचे ९ वाजून गेले होते. शाळेत महत्त्वाची बैठक होती. मात्र, सिरजा मॅडम अजून शाळेत आल्या नव्हत्या. शाळेच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
पहिला कॉल… रिंग झाली, उत्तर नाही… दुसरा कॉल… पुन्हा तीच शांतता…. तिसरा, चौथा, पाचवा… लागोपाठ अनेक कॉल्स केले पण पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही…. त्यांनी विनोद पिल्लई यांच्या मोबाईलवर आणि मुलगी पौर्णिमा हिच्या नंबरवर फोन लावले. पण, आश्चर्य म्हणजे तिघांचेही फोन रिंग होत होते, कोणीही फोन उचलत नव्हते. शाळेच्या सहकाऱ्यांनी पुण्यात राहणाऱ्या पिल्लई कुटुंबाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला आणि त्यांना तातडीने मोरवाडीतील घराकडे जाण्यास सांगितलं…..
हेही वाचा : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू; प्रकाश आंबेडकर
दरवाजा तोडताच पोलिसांना दिसलं धक्कादायक दृश्य ( Pune Family Suicide )
दुपारचे अंदाजे १२ ते १२:३० वाजले असावेत. नातेवाईक करिष्मा ग्लोरी सोसायटीत पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. आत शांतता होती. आवाज येत नव्हता. घराच्या खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना आतमध्ये काहीतरी विचित्र धुरकट वातावरण असल्याचं जाणवलं. दरवाजा आतून कडी लावलेला नव्हता, तर तो स्क्रू आणि नटांनी ब्लॉक केला होता. काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून नातेवाइकांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्याला फोन करून घटनेची माहिती दिली. लोखंडी रॉड आणि हातोड्याच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडण्यात आला. जसा दरवाजा उघडला, तसा आतूनउग्र, गुदमरवून टाकणारा केमिकलचा आणि कोळशाच्या धुराचा वास बाहेर आला. समोरचं दृश्य पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.
क्राईम सीनवर जेव्हा पोलीस पोहोचले, तेव्हा तिन्ही मृतदेह वेगवेगळ्या अवस्थेत पडले होते. कुटुंबप्रमुख विनोद पिल्लई वय ५० वर्षे हे हॉलमधील सोफ्यावर निपचित पडले होते. तपासणीअंती त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं.
पत्नी सिरजा पिल्लई वय ४५ वर्षे आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई वय १९ वर्षे या दोघी घराच्या दुसऱ्या भागात बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या नाका मुखातून फेस येत होता… पोलिसांनी जेव्हा घराची बारकाईने तपासणी केली, तेव्हा त्यांना घरात लोखंडी घमेलं आढळलं. त्या भांड्यामध्ये कोळसा जाळण्यात आला होता. त्या कोळशावर काहीतरी रासायनिक द्रव टाकण्यात आलं होतं…. घराच्या सर्व खिडक्या, बाल्कनीचे दरवाजे, अगदी दरवाजाच्या खालच्या फटी आणि व्हेंटिलेशनचे छोटे कोपरेही पूर्णपणे सील करण्यात आले होते. जेणेकरून घरातील हवा बाहेर जाऊ नये आणि बाहेरची हवा आत येऊ नये.
कोळशावर टाकलेल्या रसायनामुळे झाला मृत्यू? ( Pillai Family Suicide )
क्राईम इन्व्हेस्टिगेशन टीम ने घटनास्थळावरून रासायनिक नमुने जप्त केले. प्राथमिक तपासात समोर आलं की, हा धूर सामान्य धूर नव्हता, तर ते सोडियम नायट्रेट हे धोकादायक रसायन होते. हे रसायन जेव्हा पेटत्या कोळशाच्या संपर्कात येत, तेव्हा ते हवेतील ऑक्सिजन शोषून घेतं आणि नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड ( Carbon Monoxide ) सारख्या विषारी वायूंची निर्मिती करते. या वायूला सायलेंट किलर म्हटलं जात, कारण माणसाला कळायच्या आत तो बेशुद्ध पडतो आणि गुदमरून त्याचा मृत्यू होतो.
मोबाईलमधील सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
पोलीस तपासात महत्त्वाचा दुवा ठरतो तो म्हणजे मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा पुरावा. पिल्लई कुटुंबाच्या घरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले असता, त्यांना विनोद पिल्लई यांचा मोबाईल सापडला. मोबाईल अनलॉक केल्यानंतर पोलिसांना त्यात एक डिजिटल सुसाईड नोट सापडली. ही नोट विनोद यांच्या मोबाईलवर TYPE केलेली होती… प्पोलीसंच्या तपासानुसार नोटमध्ये लिहिलं होतं “आम्ही जे काही करत आहोत, ते स्वतःच्या इच्छेने करत आहोत. आमच्या या निर्णयाला कोणालाही जबाबदार धरू नये. या सुसाईड नोटने घातपाताचा संशय धुवून काढला आणि हे स्पष्ट केलं की हे एक सामूहिक आत्महत्येचेथंड डोक्याने केलेले नियोजन होते.
आयआयएम पदवीधर कुटुंबावर आर्थिक संकट कसं कोसळलं? ( Pillai Family Suicide )
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारी बाजू म्हणजे या कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी. विनोद हे मूळचे केरळचे रहिवासी होते. त्यांनी भारतातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या आयआयएम अहमदाबाद मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स पूर्ण केले होते. आयआयएममधून शिकलेली व्यक्ती कॉर्पोरेट जगतात लाखो करोडोंचे पॅकेज घेते. विनोद यांनीही अनेक मोठ्या खाजगी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले होते. सिरजा या देखील उच्चशिक्षित होत्या. त्या पिंपरीतील एका मोठ्या इंग्रजी शाळेत को-ऑर्डिनेटर होत्या. त्यांचा पगार आणि समाजातील पत मोठी होती. १९ वर्षांची पौर्णिमा ही चिंचवड येथील एका नामांकित कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती आणि आई वडिलांची लाडकी होती. मग असं काय घडलं की होत्याचं नव्हतं झालं?
पोलिसांनी जेव्हा विनोद पिल्लई यांच्या बँक खात्यांची, कर्जाची आणि पार्श्वभूमीची चौकशी केली, तेव्हा आर्थिक विवंचनेची साखळी समोर आली, हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरीच्या नेहरूनगर भागात राहत होते. तिथे त्यांचा स्वतःचा आलिशान फ्लॅट होता. मात्र, विनोद यांनी घेतलेले काही व्यावसायिक निर्णय किंवा कर्जाचा डोंगर इतका वाढला की, ३ वर्षांपूर्वी त्यांना कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे घर विकावे लागले. घर विकूनही कर्ज पूर्ण संपले नव्हते. ते मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीत भाड्याचा हप्ता देऊन राहू लागले. सर्वात मोठा धक्का नोव्हेंबर २०२४ मध्ये बसला. विनोद पिल्लई ज्या खाजगी कंपनीत मोठ्या पगारावर काम करत होते, तिथून त्यांची नोकरी सुटली, नोव्हेंबर २०२४ पासून ते बेरोजगार होते. वय ५० वर्षे असल्याने नवीन नोकरी मिळण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. त्यातच मुलीच्या शिक्षणाचा खर्च, घराचे भाडे आणि जुन्या कर्जाचे हप्ते डोक्यावर वाढतच होते.पत्नी सिरजा यांच्या पगारावर संपूर्ण घराचा गाडा आणि कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले होते. यातूनच कुटुंबात प्रचंड नैराश्य पसरले होते.
संत तुकारामनगर पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे, ज्याने पोलिसांच्याही अंगावर काटा आणला. हे पाऊल विनोद यांनी रागाच्या भरात उचललेले नव्हते, तर त्याचा ब्ल्यूप्रिंट दोन महिन्यांपूर्वीच तयार झाला होता. पोलिसांनी विनोद यांच्या बँक ट्रान्झॅक्शन्सची आणि ऑनलाईन ऑर्डरची तपासणी केली असता, असं आढळून आलं की विनोद यांनी १ जून रोजीच सोडियम नायट्रेट हे केमिकल ऑनलाईन ऑर्डर करून मागवले होते.
हेही वाचा : अमेरिकेतील शॉपिंग सेंटरमध्ये भीषण गोळीबार; 3 जणांचा
सोडियम नायट्रेट ऑनलाइन कसं मागवलं? पोलिस तपासात मोठा मुद्दा ( Sodium Nitrate , Carbon Monoxide )
सोडियम नायट्रेट ( Sodium Nitrate ) हे रसायन खते, फटाके किंवा औद्योगिक प्रक्रियेत वापरले जाते. मात्र, मानवी शरीरासाठी ते अत्यंत घातक असल्याने त्याच्या खुल्या विक्रीवर आणि ऑनलाईन डिलिव्हरीवर अनेक निर्बंध आहेत. पोलिसांनी आता आपला मोर्चा त्या ऑनलाईन कंपनीकडे वळवला आहे, ज्या कंपनीने हे प्रतिबंधित रसायन विनोद पिल्लई यांना घरपोच डिलिव्हर केले. कोणत्याही प्रकारच्या केवायसी किंवा परवान्याशिवाय हे केमिकल सामान्य नागरिकाला कसे मिळाले? हा पोलिसांच्या तपासातील सर्वात मोठा क्राईम अँगल आहे.
याचा अर्थ असा की, जून महिन्यापासूनच पिल्लई कुटुंबाने जगाचा निरोप घेण्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी इंटरनेटवर आत्महत्या कशी करावी जी वेदनामुक्त असेल? याबद्दल सर्च केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे? ( Pune Family Suicide )
शनिवारी दुपारी जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला, तेव्हा विनोद पिल्लई यांचा मृत्यू झाला होता. मात्र, सिरजा आणि पौर्णिमा यांच्या शरीरात अजूनही जीवनाचा एक आशेचा किरण बाकी होता. पोलिसांनी बेशुद्ध असलेल्या सिरजा आणि पौर्णिमा यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले. रसायनाचा धूर फुफ्फुसांमध्ये पूर्णपणे पसरल्यामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली होती.
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, व्हेंटिलेटर लावले, मात्र उपचारादरम्यान सिरजा पिल्लई यांनी आणि त्यानंतर काही वेळातच अवघ्या १९ वर्षांच्या निष्पाप पौर्णिमा हिनेही अखेरचा श्वास घेतला.
पिल्लई कुटुंबाची ही सामूहिक आत्महत्या ही केवळ एक पोलीस डायरीतील क्राईम स्टोरी नाही, तर ती एक भीषण सामाजिक शोकांतिका आहे. कर्जाचा विळखा आणि बेरोजगारीने एका हसत्या-खेळत्या, अत्यंत सुसंस्कृत कुटुंबाचा बळी घेतला आहे. संत तुकारामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विनोद पिल्लई यांच्या लॅपटॉप आणि मोबाईलचे सायबर फॉरेन्सिक ऑडिट केले जात आहे, जेणेकरून त्यांनी ऑनलाईन कोणाकडून कर्ज घेतले होते का? किंवा त्यांना कोणी ब्लॅकमेल करत होते का? या बाजूही तपासून पाहिल्या जातील.









