• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली; देशाची एकता आणि अखंडता जपण्याची घेतली शपथ
Top News

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली; देशाची एकता आणि अखंडता जपण्याची घेतली शपथ

website 3 7

PM Modi tribute to Sardar Patel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं त्यांना पुष्पांजली वाहिली. त्यांनी उपस्थितांना “एकतेची शपथ” दिली आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या परेडचे साक्षीदार बनले.

कार्यक्रमात भव्य परेड :

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरजवळील सरदार पटेल यांच्या 182 मीटर उंच पुतळ्याजवळ पंतप्रधान मोदी सकाळी पोहोचले. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला फुलांच्या पाकळ्या अर्पण करुन आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. यात भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन घडलं. 2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हापासून 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस (राष्ट्रीय एकता दिन) म्हणून साजरी केली जात आहे.

एकता जपण्याची शपथ :

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी देशाची एकता आणि अखंडता जपण्याची शपथ घेतली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “मी आपल्या देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी ही शपथ घेत आहे. या कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो. मी राष्ट्रीय एकतेच्या भावनेनं ही प्रतिज्ञा घेतो आणि अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करतो. एकता प्रतिज्ञा, भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा एक गंभीर संकल्प आहे.”

 

प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर परेड :

या उत्सवाचं प्रमुख आकर्षण असलेल्या राष्ट्रीय एकता दिवस परेडमध्ये बीएसएफ आणि सीआरपीएफ सारख्या निमलष्करी दलांचं आणि विविध राज्य पोलीस दलांची पथकं सहभागी झाली. यावर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या धर्तीवर ही परेड आयोजित करण्यात आल्यामुळं हा कार्यक्रम आणखी खास बनला आहे.

एकसंध, मजबूत आणि स्वावलंबी भारताचं स्वप्न (PM Modi tribute to Sardar Patel)

“सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारत त्यांना आदरांजली वाहतो. भारताच्या एकात्मतेमागील ते प्रेरक शक्ती होते, अशा प्रकारे त्यांनी आपल्या देशाचं भवितव्य त्याच्या सुरुवातीच्या काळात घडवलं. राष्ट्रीय अखंडता, सुशासन आणि सार्वजनिक सेवेसाठी त्यांची अढळ वचनबद्धता पिढ्यांना प्रेरणा देत राहते. एकसंध, मजबूत आणि स्वावलंबी भारताचं त्यांचं स्वप्न कायम ठेवण्याचा आमचा सामूहिक संकल्प आम्ही पुन्हा एकदा मांडतो,” अशी भावना नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts