नवी दिल्ली Summer Special Trains : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी उन्हाळी विशेष गाड्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत, जास्त मागणी असलेल्या मार्गांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त रेल्वे सेवांच्या प्रगतीचा मंत्र्यांनी आढावा घेतला.
हेही वाचा : कार्डिओनंतर प्रोटीन न घेतल्यास काय होतं? एकदा नक्की वाचा
देशभरात 18,262 विशेष गाड्या धावणार :
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे 15 एप्रिल ते 15 जुलै 2026 दरम्यान 18,262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची योजना आखत आहे. यापैकी 11,878 फेऱ्यांची घोषणा आधीच करण्यात आली आहे, तर उर्वरित सेवांची घोषणा टप्प्याटप्प्यानं केली जाईल. या मोठ्या उपक्रमाचा उद्देश कनेक्टिव्हिटी वाढवणं आणि प्रवाशांची सुलभ वाहतूक सुलभ करणे हा आहे.
कोणत्या स्थानकांवरुन धावणार गाड्या :
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) यांसारखी टर्मिनल्स, पुणे, सुरत (उधनासह), अहमदाबाद आणि बंगळूरु यांसारख्या प्रमुख रेल्वे केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे. प्रवाशांना त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी अधिकारी गर्दी व्यवस्थापनाचे उपाय अंमलात आणत आहेत आणि तळागाळातील मदत अधिक मजबूत करत आहेत.
गर्दी नियंत्रणासाठी विशेष योजना :
पश्चिम रेल्वेनं सुरतच्या उधना स्थानकावर रिअल-टाइम गर्दी व्यवस्थापन प्रणाली लागू केली आहे आणि प्रवासी सहाय्यता वाढवली आहे. रेल्वे संरक्षण दलाचे जवान प्रचंड गर्दी असूनही, उधना-थावरा ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना शिस्तबद्धपणे चढण्यास मदत करत आहेत, तसेच सुरक्षितता आणि कार्यक्षम आसनव्यवस्था सुनिश्चित करत आहेत. रेल्वेनं उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही प्राधान्य दिले असून, सुधारित बोर्डिंग व्यवस्था आणि स्थानक व्यवस्थापन पद्धती लागू केल्या आहेत.










