Onion Procurement Maharashtra: राज्यातील कांदा उत्पादन शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कांदा उत्पादकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.
साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्रात कांद्याची सरकारी खरेदी सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan) यांच्या नेतृत्वाखाली कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार असून शेतकऱ्यांना प्रति किलो १२ रुपये ३५ पैसे दर दिला जाणार आहे.
हेही वाचा: शेतकरी आंदोलन चिघळले; महादेव जानकर यांना ताब्यात, विनायक राऊत व राजू शेट्टीही पोलिसांच्या ताब्यात…
प्रतिक्विंटल केवळ ६०० ते ७०० रुपयांपर्यंत भाव
राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. काही ठिकाणी प्रतिक्विंटल केवळ ६०० ते ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली जात होती.
सर्व उपाययोजना
मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे आश्वासन दिले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कांदा खरेदीच्या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












