• Home
  • राजकारण
  • नितीशकुमार सलग दहाव्यांदा मुख्यमंत्री! नरेंद्र मोदींच्या उपस्थित शपथविधी संपन्न
Top News

नितीशकुमार सलग दहाव्यांदा मुख्यमंत्री! नरेंद्र मोदींच्या उपस्थित शपथविधी संपन्न

Nitish Kumar oath ceremony

Nitish Kumar oath ceremony : बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी दहाव्यांदा शपथ घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. नितीशकुमार यांच्यासह २६ जणांनी मंत्रि‍पदाची यावेळी शपथ घेतली असून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात एक मुस्लीम मंत्री तसेच तीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी संपन्न झाला. नितीशकुमार यांनी 2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. 

दहाव्यांदा शपथ घेऊन त्यांनी बिहारमध्ये सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलाय. त्यांच्यासह इतर चोवीस जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नितीशकुमार यांच्यासोबत भाजपच्या चौदा तर जदयूच्या आठ आणि चिराग पासवान यांच्या एल जे पी पक्षाच्या एकाचा समावेश आहे. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या सर्वांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 

या शपथविधीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

हेही वाचा – बिहारमध्ये दसवी बार नितिश कुमार! सोहळ्याला पंतप्रधानांसह अमित शाह राहणार हजर

नव्या सरकारमध्ये मंत्रिपद देताना जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. मंत्र्यांच्या यादीत तीन महिला आहेत तर पहिल्यांदाच आमदार झालेल्या तिघांची मंत्रीमंडळात वर्णी लागलीय. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात एका मुस्लीम मंत्र्याचाही समावेश आहे.

एनडीएने २०२ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर नितीश कुमार यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी बुधवारी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेतली आणि पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्यापूर्वी राजीनामा सादर केला. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला, २४३ पैकी २०२ जागा जिंकल्या. महाआघाडीला फक्त ३५ जागा मिळाल्या. बिहारमध्ये एनडीएने २०० जागांचा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे, २०१० मध्ये पहिल्यांदाच त्यांनी २०६ जागा जिंकल्या होत्या.

एनडीएमध्ये, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ८९ जागा जिंकल्या, जद(यू) ने ८५ जागा जिंकल्या, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने १९ जागा जिंकल्या, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) ने पाच जागा जिंकल्या आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागा जिंकल्या. विरोधी पक्षांमध्ये, राष्ट्रीय जनता दल (RJD) ने २५ जागा जिंकल्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सहा, CPI(ML)(L) ने दोन, भारतीय समावेशक पक्षाने एक आणि CPI(M) ने एक जागा जिंकली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने पाच जागा जिंकल्या, तर बहुजन समाज पक्षाने (BSP) एक जागा जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts