Bakari Eid Durgadi Fort Protest: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथील दुर्गाडी किल्ला परिसरात आज तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी मार्गातच रोखले. यानंतर कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले.
ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. किल्ला परिसरातील धार्मिक संवेदनशीलता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळपासून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्याकडे मोर्चा काढत आंदोलन सुरू केले. यावेळी काही कार्यकर्ते पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेड्सवर चढल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांकडून घंटानाद आणि आरती करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी मंदिरात भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत भाविकांना दर्शनाची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
दुर्गाडी किल्ला परिसरात दुर्गा देवीचे मंदिर आणि पायथ्याशी ईदगाह असल्याने हा भाग धार्मिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. अनेक वर्षांपासून या ठिकाणाच्या धार्मिक स्वरूपावरून वाद सुरू असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी किल्ला परिसर, प्रवेशद्वार आणि आसपासच्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सौहार्द जपावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर
तसेच, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर शहरात पोलिस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी शहरभर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून प्रमुख चौक आणि गर्दीच्या परिसरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. एकूण ४३ ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मशिदी परिसर, प्रमुख बाजारपेठा, वाहतूक मार्ग तसेच स्लॉटर पॉईंट परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून सतत परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी घडलेल्या किरकोळ वादानंतर पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सध्या शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणताही तणाव नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील अपप्रचारावर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सौहार्द कायम राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












