Dhananjay Munde: बीड जिल्हा (Beed News) नियोजन समितीच्या बैठकीत कथित शाब्दिक वाद आणि शेतकऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या चर्चांवर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध (Social Media) केलेल्या निवेदनातून त्यांनी काही माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या वृत्तांवर नाराजी व्यक्त करत तथ्यांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावरून दिले स्पष्टीकरण
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून स्वतःबाबत प्रसारित होत असलेल्या काही बातम्या पाहून त्यांना खेद वाटला. कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे ही माध्यमांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक शांत आणि सकारात्मक वातावरणात पार पडली असून बैठकीदरम्यान विरोधी पक्षातील कोणत्याही लोकप्रतिनिधीसोबत त्यांचा वाद किंवा शाब्दिक चकमक झालेली नाही.
मतभेद असू शकतात, पण संवाद कायम असतो
मुंडे यांनी स्पष्ट केले की, राजकारणात वैचारिक मतभेत असणे स्वाभाविक असले तरी त्यातून वैयक्तिक संघर्ष निर्माण होत नाही. विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्ये संवाद आणि परस्पर आदर कायम असल्याचेही त्यांनी म्हटले.
त्यांच्या मते, बैठकीला उपस्थित असलेल्या व्यक्तींशी चर्चा केली असती तर वास्तव समोर आले असते. मात्र, काही ठिकाणी अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरवून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांना दम दिल्याच्या चर्चेवरही प्रतिक्रिया
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांशी कठोर भाषेत बोलल्याचं आरोपही त्यांनी फेटाळून लावला. मुंडे यांचं म्हणण्यानुसार, कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी असल्यामुळे आवाजाचा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी आपले प्रश्न शांतपणे आणि क्रमाने मांडावेत, अशी विनंती त्यांनी केली होती.
याच घटनेचा चुकीचा अर्थ लावून त्यांनी शेतकऱ्यांना दम दिल्याचा प्रचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
काही माध्यमांवर अप्रत्यक्ष टीका
धनंजय मुंडे यांनी आपल्या निवेदनात काही माध्यम प्रतिनिधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली. जिल्ह्यातील बहुतांश पत्रकार जबाबदारीने आणि निष्पक्षपणे काम करतात, त्यांच्या कार्याचा आपण आदर करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, काही व्यक्तींविषयी आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारी पूर्वीपासून आपल्या निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला. तरीही कोणाचे नुकसान होऊ नये या भूमिकेतून त्यांनी यापूर्वी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी नमूद केले.
जबाबदार माध्यमांना आणि माध्यमकर्मींना कळकळीची विनंती…
मागील दोन दिवसांपासून विशेष करून समाज माध्यमावर सुरू असलेल्या काही बातम्या पाहून व्यथित झालो, वाईट वाटले. ठराविक माध्यमांना माझे कळकळीचे आवाहन आहे, कृपया कोणतेही वृत्त प्रसारित करताना शहानिशा करण्याची थोडी तसदी घ्या.
बीड…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 1, 2026
सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन
बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण पुन्हा स्थिर होत असल्याचे सांगत चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी माध्यमांना आणि संबंधितांना केले.
वादाची पार्श्वभूमी
अलीकडे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा विविध स्तरांवर सुरू होती. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता.
या सर्व चर्चांवर आता धनंजय मुंडे यांनी अधिकृत भूमिका मांडत बैठकीत कोणताही वाद झालेला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील काळात संबंधित इतर पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









