CM Fadnavis cooking oil appeal : पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि तेल व वायूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला काही जिवनाश्यक वस्तूंची बचत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी देखील तोच धागा पकडत राज्यातील नागरिकांना इंधन आणि इतर संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन (Appeal to the Public) केले आहे. जर लोकांनी आता खबरदारी घेतली नाही, तर भारताला भविष्यात इंधनाच्या तुटवड्याचा (Fuel shortage) सामना करावा लागू शकतो, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा – मोदींचे जनतेला ‘त्यागा’चे आवाहन; राहुल गांधींची खरमरीत टीका; ‘हे उपदेश नव्हे, अपयशाचे पुरावे’
जागतिक युद्धाचा तेलावर परिणाम
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. या संघर्षामुळे अनेक देशांमध्ये तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला असून किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे आणि पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे देशाला पुरेसे तेल आणि वायू मिळत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल
“भारताने आयातीवरील अवलंबित्व कमी करून जबाबदार जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. त्यांनी विशेषतः लोकांना खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, भारत खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करतो. जर प्रत्येक कुटुंबाने थोडे तेल वाचवले, तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल आणि लोकांचे आरोग्य सुधारेल,” असं रविवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जनतेला तोच धागा पकडत आवाहन केलं आहे.
सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यामुळे केवळ पर्यावरणाचेच संरक्षण होणार नाही, तर देशाच्या परकीय चलनाचीही बचत होईल. त्यांनी लोकांना सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग, मालवाहतुकीसाठी रेल्वे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचा सल्लाही दिलाय. त्यांच्या या आवाहनानंतर लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला मोदींच्या कारभारावर केला.












