Sayaji Shinde criticism on government: नाशिक येथील तपोवणात साधूग्राम साठी महापालिकेने 1800 वृक्षतोड करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे आता वृक्षप्रेमी आणि अभिनेते सायाजी शिंदे भडकल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी जगात एकच सेलिब्रिटी आहे आणि तो म्हणजे झाड, असं म्हणत अभिनेते सायाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. याठिकाणी सध्या वृक्षप्रेमीनी आंदोलन छेडले असून महापालिकेच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
कुंभमेळा साधूग्रामसाठी नाशिक येथील तपोवन याठिकाणी वृक्षतोड केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. महापालिका 1800 झाडांवर हातोडा फिरवणार असल्याचे वृत्त समोर येताच नाशिककरांसह पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला.
आणि आंदोलन छेडण्यात आले. नुकतेच झालेल्या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहभाग नोंदवत आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. त्यांनी सर्व नाशिककरांना सरकार विरोधात एकत्र येण्याचं आवाहन देखील केले आहे.
नाशिककरांनो याठिकाणी मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही
जगाच कोणताच सेलिब्रिटी नसून जगात एकच सेलिब्रिटी आहे आणि तो म्हणजे झाड, सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्न पाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणा. नाशिककरांनो याठिकाणी मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, तुमचा माणूस म्हणून मी याठिकाणी आलेलो आहे. चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचं आहे आणि वाईट माणसं जरी आपली नातेवाईक असतील, मित्र असतील तरी ती वाईटच आहेत त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरु देणारच नाही. असे वक्तव्य सायाजी शिंदे यांनी केले.
हे ही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार की नाही..? सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
हा महाराजांचा अपमान आहे
जेव्हा याठिकाणी सांगण्यात आले की 10 वर्षांची झाडं तोडण्यात येणार असून साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी हे झाडे तोडण्यात येत आहे यावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसांची गरज असताना तिथे हजार माणसं आली तर, ते साधू संत नसतात, अशा माणसांनी येथे येऊन नाशिकची वाट लावू नका, सर्व नाशिककरांनी एकत्र आलं पाहिजे, येथे गवताची काडी देखील तुटली नाही पाहिजे हा महाराजांचा अपमान आहे हा तुकोबांचा अपमान आहे या सगळ्यांनी दिलेली शिकवण आपण पूढे घेऊन जात आहोत. आम्ही फसणार नाही आणि तुम्हाला फसवू सुद्धा देणार नाही असे ते म्हणाले.
गिरीश महाजन तुमची माझ्यासोबत दुश्मनी नाही
साधू आले गेले मेले आम्हाला माहित नाही परंतु झाडे जीवंत राहिली पाहिजे झाडाची व्याख्या करणे अजून राज्य सरकारला माहीत नाही. गिरीश महाजन माझी तुमच्यासोबत दुश्मनी नाही आणि झाली तरी काही हरकत नाही केंद्र सरकारनेच सर्वात जास्त झाडं तोडली असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन आणि सरकारवर निशाण साधला.












