PM Narendra Modi On TMC | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरा जिल्ह्यातील विष्णुपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसवरील निशाणा साधला.बंगालच्या मुलींनी आमदार-खासदार व्हावे असं तृणमूल काँग्रेसला वाटत नाही, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा – कोणीतरी येणार येणार गं…, रणवीर-दीपिका पुन्हा होणार आई-बाबा; लेकीने दिली हटके अंदाजात गुड न्यूज
पंतप्रधान मोदींनी नेमके काय केले आरोप?
सभेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपली प्रत्येक सभा ही मागच्या सभेपेक्षा मोठी होत आहे. मला सांगण्यात आलं की लोक या सभेसाठी 2-3 तास बसले आहेत. हे वातावरण, हे प्रेम, हा उत्साह, हा जोश, हे आंदोलन त्या क्रूर सरकारविरोधातील संतापाचे प्रतीक आहे. भाजप सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी ओळखला जातो. म्हणूनच देशातील प्रत्येक राज्यातील भगिनी आणि मुली भाजपला सर्वाधिक आशीर्वाद देतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बंगालच्या मुलींनी आमदार आणि खासदार व्हावे, असं टीएमसीला वाटत नाही. बंगालच्या महिलांना 33% आरक्षण 2019 पासून लागू व्हावं असं वाटत होतं. भाजपने त्यासाठी प्रयत्नही केले. पण तृणमूल काँग्रेसला बंगालच्या मुली आमदार आणि खासदार व्हाव्यात असं वाटत नव्हतं, कारण बंगालच्या मुली त्यांच्या ‘महा जंगलराज’ला आव्हान देत होत्या. त्यामुळे, तृणमूल काँग्रेसने काँग्रेससोबत कट रचून महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा मंजूर होऊ दिला नाही”, असे गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केले आहेत.
विकसित भारताच्या उभारणीत मुलींची भूमिका अधिक व्यापक करणे आणि अधिकाधिक मुलींना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. संसदेत काय घडले ते तुम्ही पाहिले आहे. टीएमसीने पुन्हा एकदा बंगालच्या भगिनींचा विश्वासघात केला आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भगिनींची सुरक्षा, माता-भगिनींचा सन्मान आणि तुमची समृद्धी ही भाजपची प्राथमिकता आहे. आजही टीएमसी सरकारच्या भ्रष्टाचारामुळे बंगालमधील महिलांना ते लाभ मिळत नाहीत, जे त्यांना भाजप सरकारच्या काळात मिळाले असते. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यास गरीब महिलांना मोफत रेशन मिळेल आणि कोणीही तुमचे रेशन चोरू शकणार नाही, असे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिले आहे.












