Ambad Hostel Food Controversy : अंबड तालुक्यातील वलखेडा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहाचा (Girls’ Hostel Valkheda) भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. वसतिगृहातील जेवणात चक्क अळ्या, किडे आणि उंदराच्या लेंड्या (Maggots, insects, and rat droppings in the food) आढळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पिण्याचे अस्वच्छ पाणी, निकृष्ट जेवण आणि वसतिगृहातील इतर अनेक असुविधांना कंटाळून सुमारे ३५ विद्यार्थिनींनी थेट अंबडच्या तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल (Written complaint filed) करत न्याय देण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थिनी या वसतिगृहात राहत असून त्यांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा – CET Cell : बीएड परीक्षेत तांत्रिक गोंधळ, ‘या’ केंद्रावरील परीक्षा पुन्हा घेण्याची नामूष्की
विद्यार्थिनींनी २१ गंभीर त्रुटी प्रशासनासमोर मांडल्या
यासंदर्भात वसतिगृहाच्या वॉर्डनकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती बदललेली नाही. तक्रार केल्यावर केवळ दोन-तीन दिवस सुधारणा होते आणि त्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणेच अनागोंदी कारभार सुरू होतो, अशी उद्विग्नता विद्यार्थिनींनी या निवेदनात व्यक्त केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थिनींनी वसतिगृहातील एकूण २१ गंभीर त्रुटी प्रशासनासमोर मांडल्या आहेत. यात प्रामुख्याने अन्न आणि आरोग्याशी होत असलेला खेळ उघडकीस आला आहे.
जेवणात अळ्या, किडे आणि उंदराच्या लेंड्या
किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता असून जेवणात अळ्या, किडे आणि उंदराच्या लेंड्या आढळत असल्याचा गंभीर आरोप मुलींनी केला आहे. जेवणात खराब अंडी आणि अस्वच्छ चिकनचा वापर केला जातो. दुधातही पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पिण्याचे पाणीही अतिशय अस्वच्छ दिले जाते. एकाच प्रकारची भाजी वारंवार बनवली जाते आणि जेवणही कधीच वेळेवर मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणावर अभाव
जेवणाव्यतिरिक्त इतर मूलभूत सुविधांचाही वसतिगृहात पूर्णपणे अभाव असल्याचे या पत्रातून समोर आले आहे. वसतिगृहात गरम पाण्याची कोणतीही सुविधा नाही, तसेच एखादी विद्यार्थिनी आजारी पडल्यास साधी प्रथमोपचार पेटी देखील उपलब्ध नाही. स्वच्छतेसाठी लागणारे साहित्यही अपुरे दिले जाते. मुलींच्या अभ्यासातही वारंवार व्यत्यय येत असून स्टडी रूममध्ये लाईट आणि फॅनची सुविधा नाही. राहत्या रूममध्येही लाईटचा अपुरा पुरवठा आहे.
वेळेवर बस न मिळण्याच्या अडचणींचाही सामना
याशिवाय, सिक्युरिटी गार्ड्सचे काम व्यवस्थित नसून ते मुलींमध्ये दुजाभाव करतात. सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कारणास्तव मुलींना वसतिगृहाबाहेर जाऊ दिले जात नाही आणि वेळेवर बस न मिळण्याच्या अडचणींचाही सामना करावा लागतो, असे विद्यार्थिनींनी म्हटले आहे. या निवेदनावर जीएनएम, आयटीआय, पॉलिटेक्निक आणि बीएससी अशा विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या एकूण ३५ विद्यार्थिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत.










