Bachchu Kadu: शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय बच्चू कडूं यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करताना बच्चू कडू आता शिवसेनेचा “धनुष्यबाण” हाती घेणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडू यांनी सांगितलं की, ” आमचे सर्व मुद्दे शिवसेनेनं मान्य केले आहेत. दिव्यांग शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचं आश्वासन मिळाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला. “त्यांनी पुढे म्हटलं की, आपल्या सामाजिक कार्यात कोणतीही तडजोड होणार नाही आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील.
प्रहार संघटनेबाबत बोलताना कडू यांनी स्पष्ट केलं की, संघटना सामाजिक पातळीवर कार्यरत राहील. राजकीय पातळीवर शिवसेनेत काम करत असतानाही प्रहारचं अस्तित्व कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या घडामोडींमुळे आगामी Maharashtra Vidhan Parishad Election 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. बच्चू कडू यांच्या या निर्णयाचा निवडणुकीत आणि राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












